भुईंज – साताराहून मुंबईकडे निघालेल्या इर्टिगा कारने आनेवाडी टोलनाक्यावर टोल भरुन पुढे आल्यानंतर अचानक पेट घेतला. ही बाब वाहनातील सदस्यांच्या लक्षात येताच सर्वजण तातडीने कारमधून बाहेर आले. मात्र, टोलनाक्यावर आग विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने इर्टिगा कार अक्षरश: जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील कारी येथील दत्तात्रय मोरे हे आपल्या कुटुंबियांसमवेत त्याच्या स्वमालकीच्या इर्टिगा कारमधून गुरुवारी पहाटे मुंबईला निघाले होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मोरे यांची कार आनेवाडी टोलनाक्यावर टोल भरुन पुढे आली आणि गाडीने अचानक पेट घेतला. गाडी पेटल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी थांबवत गाडीतील सर्वांना बाहेर काढले. अचानक पेटेली इर्टिगा पाहून टोलनाक्यावरील कर्मचारीही धावत तेथे गेले. परंतु, आग विझविण्याची यंत्रणाच टोलनाक्याकडे नसल्याने मोरे कुटुंबयांना डोळ्यादेखत कार जळून खाक होत असताना पहावी लागली. दरम्यान, आनेवाडी टोलनाक्यावर आग विझविण्यासाठी यंत्रणा असती तर कार जळून खाक झाली नसती अशी संतप्त भावना दत्तात्रय मोरे यांनी व्यक्त केली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.