पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणेकरांना समान पाणी देण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणार्या समान पाणीपुरवठा योजनेस तिसर्यांदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या कामासाठी जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.
सन २०१६ मध्ये काम सुरू झालेल्या या पूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली असली, तरी अद्यापही या योजनेचे काम ६० ते ६५ टक्केच झाले आहे. मुदतवाढ देण्यात आल्यानंतर काम पूर्ण होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ही योजना रखडत असून दुसर्या बाजूला त्याचा खर्चही वाढत आहे.
महापालिकेकडून शहरात समान पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे २ हजार ५१५ कोटींची समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम तीन टप्प्यात केले जाणार असून त्यात, १६०० किलोमीटरच्या जलवाहीनी टाकणे, ७२ पाण्याच्या टाक्या उभारणे तसेच २ लाख ८२ हजार पाण्याचे मीटर बसविण्यात येणार आहेत.
या योजनेसाठी केंद्रशासनाच्या अमृत योजनेतून महापालिकेस टाक्यांसाठी निधी मिळणार आहे. तर पालिकेने कर्जरोखेही काढलेले आहेत. त्यामुळे प्रकल्पाचा वेळ वाढल्यास त्याचा भार महापालिकेवरच येणार आहे. ही योजना मार्च २०२३ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. करोना, लॉकडाउन व अन्य कारणांनी योजनेचे काम रखडल्याने सुरवातीस सप्टेंबर २०२३ पर्यंत आणि त्यानंतर मार्च २४ पर्यंत या योजनेस मुदतवाढ करण्यात आली. आता पुन्हा प्रशासनाने जून २०२४ पर्यंतच्या मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
अशी आहे सद्यस्थिती
या योजने अंतर्गत आतापर्यंत शहरात सुमारे १ लाख ५० हजार मीटर बसविण्यात आले असून, ९० हजार मीटर बसविण्याचे काम शिल्लक आहे. तर ७२पैकी ५० टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. ८५० किलोमीटरच्या जलवाहीनीचे कामही पूर्ण झाले असून, नवीन टाकण्यात येणार्या सुमारे ३५० किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे प्रशासनाने जून २०२४ पर्यंतची मुदतवाढ मागितली असली, तरी प्रत्यक्षात ३० एप्रिलपर्यंतच रस्त्यांची खोदाई करता येणार आहे. तसेच मार्च ते मेपर्यंत लोकसभेच्या निवडणुका असल्याने हे काम वेगाने होण्याची शक्यता धूसरच आहे.