उत्तम पिंगळे
आनंद व सुख हे मानण्यावर असतं असं नेहमी बोललं जातं आणि ते खरंही आहे. अलीकडे आनंदास शब्दच कमी होत चालले आहे. अगदी लहान मुलानेही हट्ट करून मागितलेली वस्तू जरी त्याला दिली तरी ती वस्तू मिळालेल्या आनंदाची जागा आता विजयाने घेतलेली आहे. अर्थात त्याला कारणही तसे आहे, बहुतेक विभक्त घरांमध्ये आईबाबा दोघंही कामावर जातात व एखादेच अपत्य असते मग त्याचे लाड पूर्ण करत असतानाच ते हट्टी कधी बनते ते समजतच नाही. मग अशा मुलांच्या निरागसतेची जागा आपोआप विजयाने घेतलेली दिसते. मुलांनाही कळून चुकते की आपण हट्ट केला की आपल्याला हवी ती वस्तू मिळते.
आता हे सर्व सांगण्याचे कारण 40-45 वर्षांपूर्वी आधुनिक सेवा नव्हत्या म्हणजे आपल्याकडे दूरदर्शनही नव्हते. साधारणत: 1970चा तो काळ. त्या वेळी असणाऱ्या सुविधाही अत्यल्पच होत्या. तरीही लोक आनंदी असायचे असे म्हटले जाते व आता ते खरोखर असल्याचे वाटू लागले आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींतूनही आनंद मिळत असे. त्या काळात म्हणजे आमच्या बालपणी कुणी पुणे-मुंबईहून पाहुणे आले तर येताना बिस्कीट पुडा आणत. तो पाहताच आम्हा मुलांना अत्यंत आनंद होई. कारण असल्या वस्तू पैसे देऊन आणण्याची आमच्याकडे पद्धत नव्हती व ऐपतही. मित्रमंडळही सर्व बहुतेक सारख्याच आर्थिक परिस्थितीचे आणि एक दोन श्रीमंत मित्र होते; पण आमच्यात खेळायला आल्यावर आपला श्रीमंतपणा गहाण ठेवत असत. सुट्टीच्या दिवशी विटी-दांडू वा क्रिकेट असे खेळ दिवसभर खेळत असू. संध्याकाळी सर्व दमल्यावर थेट घरी न जाता शेजाऱ्यांच्या हातपंपावर किंवा विहिरीतून पाणी काढून हातपाय धूत असू. पाणी प्यायल्यावर क्षणात सर्व थकवा नाहीसा होई.
आता तर घराघरात वॉटर प्युरिफाय अगदी आरओ लावले जात आहेत. अर्थात त्याचे कारणही तसेच आहे, अंदाधुंद व्यवस्थेमुळे सांडपाणी, रसायने जमिनीत मुरू लागले असून विहिरींनाही प्रदूषित केले आहे. चिंचा-बोरांच्या झाडावर चढून काढलेल्या चिंचा व बोरे तसेच कैऱ्या तेथेच खाण्यात जो आनंद मिळे तो अवर्णनीय. आमच्या मामेभावाकडे धुणेभांडी करणाऱ्या मावशींच्या मळ्यात जाऊन हाताने टॉमेटो काढून तो तेथेच खाण्यात खूप आनंद मिळे. पुढे माध्यमिक शाळेत अचानक मिळणारा ऑफ पिरियड व त्या वेळी मैदानावर जाऊन खेळलेली आबादूबी वा कबड्डीचा आनंद औरच असे. आज कुणी टिचर येणार नसेल तर दुसरीच टिचर येऊन अभ्यास पूर्ण करण्याचा अट्टाहास करताना दिसत आहे. गणपतीच्या वेळी कोणाच्याही घरी बिनदिक्कतपणे गणपती पाहण्यासाठी व आरतीसाठी जाणे, विविध आरास पाहणे व विविध प्रकारचा प्रसाद घेणे यात खरा आनंद होता. शेजारच्या घरात भल्या मोठ्या रेडिओवर पहाटे चालू असलेली भारत-ऑस्ट्रेलिया मॅचची कॉमेंट्री ऐकणे याचा आनंद काही औरच असे.
आता सर्वच बाबी अगदी क्रिकेटही अती झालेलं आहे व “अति तेथे माती’ त्याप्रमाणे अप्रूप राहिलेले नाही. आभासी आनंद खूप वाढला आहे. म्हणजे पाहा, फेसबुकवर हजारभर मित्र, व्हॉट्सऍप ग्रुप त्यातून होणाऱ्या चर्चा हाच आनंद मानला जात असून वास्तविक बोलणे किंवा स्वतःच्या नातलगांशीही संभाषण होत नाही. म्हणून सर्वांनी वास्तव आनंद मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी वेळ द्यावा लागतो तो कुणाकडेच नाही. वेळ काढावा लागेल. प्रत्येक वास्तव आनंदाचा एकेक मणी गुंफत गेल्यास त्याचे सुखामध्ये रूपांतर होईल.