चित्तोर : चीनमध्ये एक हजाराहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूची बाधा झाली असल्याच्या संशयाने आंध्र प्रदेशात एकाने आत्महत्या केली. बालकृष्णन असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडल्यानंतर आपल्यामुळे कुटुंबियांना लागण होईल, अशी भीती वाटल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. चित्तोर जिल्ह्यात ही सोमवारी घडलेली ही घटना बुधवारी उजेडात आली.
बालकृष्णा यांच्यावर तिरूपती रुग्णालयात गेल्या आठवड्यात उपचार करण्यात आले होते. त्यांना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यावर त्यांना चित्तोर जिल्ह्यातील आपल्या गावी रविवारी परतले. मात्र आपल्याला करोनाची बाधा झाली आहे, अशी भीती सारखी वाटत होती. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी करोनाच्या संदर्भातील अनेक व्हिडिओ पाहिले होते. ते कुटुंबियांना जवळ येऊ देत नसत.
कुटुंबीय जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास ते त्यांना दगड फेकून मारत असत. अखेर त्याने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम पेनचलाईह यांनी सांगितले.
बाळकृष्णन यांनी त्यांच्या आईच्या समाधीजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना साधा थंडीताप आला होता. त्याला व्हायरल इनफेक्शन झाल्याचे सांगून औषधे दिली आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने आपल्याला करोना विषाणूंची बाधा झाल्याचा ग्रह करून घेतला.
त्यांचा मुलगा बालमुरली यांनी सांगितले, ते आम्हाला आणि इतरांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून चिंतीत होते. त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास ते दगड फेकून मारत असत. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली.