लंडन – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आजपासून सुरू होत असलेल्या दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी चुरस रंगणार आहे. या सामन्यात चेतेश्वर पुजाराला बाहेर बसावे लागण्याची चिन्हे दिसत असून अजिंक्य रहाणेला अखेरची संधी मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या दोन संघांतील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना संततधार पावसाने अनिर्णित राहिल्यामुळे या दुसऱ्या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला 2007 व 2014 साल वगळता प्रत्येक वेळी पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
यंदा पहिला सामना अनिर्णित राहिल्यामुळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार कोहली खूश आहेत. तसेच गेल्या दोन मालिकांमध्ये भारतीय संघाने जशी चमकदार कामगिरी केली त्याचीच पुनरावृत्ती या मालिकेतही करण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकली तर इंग्लंडच्या फलंदाजांना हा सामना कठीण जाण्याची शक्यता आहे.
त्यांचा कर्णधार ज्यो रूटने पहिल्या कसोटीत शतकी खेळी करताना भारताच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला होता. मात्र, त्यांच्या अन्य फलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले होते. जर या सामन्यात रूटला लवकर बाद करण्यात यश आले तर भारतीय संघाला फार मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार नाही. त्यातच इंग्लंडचे सलामीवीर फलंदाजही फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत.
भारताच्या फलंदाजीबाबतच जास्त चिंता निर्माण झालेली आहे. सलामीवीर रोहित शर्मा चांगला खेळत असला तरीही त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. लोकेश राहुल याने जबाबदारीने फलंदाजी केल्यामुळे काहीसे समाधान असले तरीही कर्णधार कोहलीसह चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची सुमार कामगिरी संघाच्या चिंतेत भर टाकत आहे. कोहलीने तर गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त काळ शतकी खेळी केलेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी सरस झाली असली तरीही त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
पहिल्या कसोटीत यजमान संघाला द्विशतकी धावंच्या आत रोखल्यानंतर भारतीय संघाने तळातील फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर 95 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. मात्र, या डावात रोहित, कोहली, पुजारा, रहाणे व यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी साफ निराशा केली होती. पंतने सुरुवात चांगली केली होती पण अनावश्यक आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट बहाल केली.
रवीचंद्रन अश्विनची निवड निश्चित
अंतिम 11 खेळाडूंच्या संघात पुजाराला स्थान मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर दुखापतीने शार्दुल ठाकूर या सामन्यात खेळू शकणार नसल्यामुळे रवीचंद्रन अश्विनच्या रूपाने एक जास्तीचा फिरकी गोलंदाज खेळवला जाण्याचीही शक्यता आहे. या मैदानाच्या खेळपट्टीवर गेल्या काही सामन्यांत फिरकी गोलंदाजांनी यश मिळवले असल्यामुळे भारतीय संघात जडेजा व अश्विन या दोन फिरकी गोलंदाजांना स्थान मिळणार आहे.
रवींद्र जडेजाने दमदार अर्धशतकी खेळी केली होती तर जसप्रीत बुमराहने उपयुक्त खेळी करत संघाला अडीचशेपेक्षा जास्त धावसंख्या उभारून दिली होती. मात्र, हे प्रत्येक सामन्यात घडणार नाही त्यामुळे भारतीय संघाच्या पहिल्या पाच फलंदाजांना या सामन्यात अत्यंत जबाबदारीने खेळावे लागणार आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजीला फिरकी गोलंदाज व भक्कम फलंदाज मोईन अलीच्या समावेशाने बळकटी आली आहे. त्यातच मोईन अलीने कोहलीला यापूर्वी अनेकदा बाद केले असल्याने त्याचा कोहलीशी होणार सामना रंगतदार ठरेल. प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या गोलंदाजीवर वर्चस्व राखले तर भारतासाठी हा सामना जिंकणे फारसे कठीण जाणार नाही. स्टुअर्ट ब्रॉड व ओली रॉबिन्सन यांच्या गोलंदाजीवर तळातील फलंदाजांनीही धावा काढल्या असल्याने त्याचे दडपण भारतीय संघाला जाणवणार नाही.