-अमित डोंगरे
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दोन गोष्टी भोवल्या. एक म्हणजे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट आणि मुसळधार पाऊस. आता आजपासून सुरू होत असलेला दुसरा कसोटी सामना भारतीय संघाला जिंकायचा असेल तर याच दोन गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.
निसर्गावर कोणाचीच सत्ता चालू शकत नाही. त्यामुळे पाऊस याही सामन्यात कोसळला तर भारतीय संघच नव्हे तर यजमान संघही काही करू शकणार नाही. पण रूटच्या फलंदाजीची पाळेमुळे खणून काढण्याचे काम जसप्रीत बुमराह, महंमद शमी, महंमद सिराज व रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाला करावेच लागेल. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करताना यजमान संघाला द्विशतकी धावांच्या आत रोखले. तसेच लोकेश राहुल, जडेजा यांनी अर्धशतकी फटकावली. त्यांना काही प्रमाणात साथ देताना ऋषभ पंत व जसप्रीत बुमराह यांनी उपयुक्त फलंदाजीही केली व संघाने 95 धावांची बहुमोल आघाडी घेतली. इथपर्यंत सगळे काही भारतीय संघाच्या बाजूने घडत होते.
मात्र, त्याचवेळी इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीने भारतीय संघाचे ग्रह फिरतात तसे फिरले व इंग्लंडच्या दुसऱ्या डावात रूटने संकटमोचक बनून दमदार शतक फटकावले. त्याने भारताच्या सगळ्याच गोलंदाजांसमोर नेटाने फलंदाजी केली व संघाला त्रिशतकी मजल मारून देताना भारतासमोर विजयासाठी दोनशेपेक्षा जास्त धावा करण्याचे आव्हान ठेवले. भारतानेही थाटात सुरुवात केली होती.
पहिल्या डावाप्रमाणे याही डावात भारताच्या राहुलने चांगली खेळी केली. मात्र, तो इथेच कमी पडतो. त्याला चांगल्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करता येत नाही. तो बाद झाला आणि त्याचवेळी वरुणराजाचे राज्य सुरू झाले. हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी भारतीय संघाला 157 धावांची गरज होती. मात्र, पावसाने ही संधीच हिरावून घेतली. निसर्गापुढे भारतीय संघ हतबल झाला व हा सामना अनिर्णित राहिला. आता हे दोन संघ दुसऱ्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
भारतीय संघ पावसावर तर मात करू शकत नाही पण रूटला रोखण्याचे प्रयत्न तरी निश्चितच करू शकतो. आजच्या इंग्लंड संघात बेन स्टोक्स नसल्याने रूटला रोखले तर भारतासाठी हा सामनाच नव्हे तर ही संपूर्ण मालिका सोपी ठरू शकते. रूटच्या फलंदाजीचे एक विशेष आहे की, तो कधीही आपली विकेट समोरच्या गोलंदाजाला स्वस्तात देत नाही. गोलंदाजाला कठोर मेहनत करायला लावतो.
आपले फलंदाज ज्या स्वस्तात आपल्या विकेट बहाल करतात ते पाहिले की रूटच्या संयमाचे महत्त्व पटते. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, भारताचा विराट कोहली व इंग्लंडचा ज्यो रूट हे सध्याचे सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. त्यातही कोहलीच्या नावाचा डंका जरा जास्तच गाजत असला तरीही एक गोष्ट कोणीही मान्य करेल की, सर्वोत्तम कसोटी फलंदाजाचा निकष लावला तर कोहली या दोघांच्याही कित्येक पावले मागेच आहे.
इंग्लिश वातावरणात कसोटी सामन्यात कशी फलंदाजी करावी हे कोहलीने या मालिकेत रूटकडून शिकावे यावरच भारतीय संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.