-अमित डोंगरे
भारतीय संघ विशेषतः कर्णधार विराट कोहली ज्या गोष्टीची वाट पाहात होता ती अखेर घडली. भारताचा सर्वात प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सुर गवसला हे खूप समाधान देणारे ठरले. इंग्लंविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 गडी बाद करत त्याने इंग्लंडवर वर्चस्व गाजवले. आता हाच फॉर्म संपूर्ण मालिकेत कायम राहावा हीच अपेक्षा आहे.
या कसोटीला सुरुवात झाली तेव्हा भारताचे वेगवान गोलंदाज किती यशस्वी होतील अशी शंका होती. कारण इंग्लंडच्या वातावरणात भुवनेश्वर कुमार नसल्यामुळे एकट्या शमीवरच स्विंगची जबाबदारी राहणार हे उघड होते. त्यातच महंमद सिराज नवखा आहे, त्यामुळे त्याच्याकडून कमाल नव्हे तर किमान अपेक्षा आहेत. उमेश यादव वेगाने चेंडू टाकत असला तरीही अंतिम संघात त्याचा समावेश होणार नाही हे देखील उघड होते. त्यातच प्रमुख अस्त्र बुमराह याचा सुर हरपला होता. गेल्या मोसमापासून त्याला सातत्याने अपयश येत होते. इंग्लंडमध्येच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीतही बुमराह साफ अपयशी ठरला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत तो यशस्वी ठरतो का यावरच संघाचे यशापयश अवलंबून होते. मात्र, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट म्हणतात तेच खरे ठरले.
या मालिकेची सुरुवात नॉटिंगहॅमच्या ट्रेन्टब्रीज मैदानावर पहिल्या कसोटीने झाली. या मालिकेत इंग्लंडचा संघ कोणताही धोका न पत्करता वेगवान गोलंदाजीसाठी खेळपट्टी तयार करणार याचाही अंदाज होता व तो खराही ठरला. मात्र, त्यांच्याकडे जेम्स अँडरसन आणि सातत्याने स्विंग करेल असा ओली रॉबिन्सन वगळता एकही गोलंदाज नाही. हीच त्यांची कमकुवत बाजू आहे व ती सिद्धही झाली.
भारताची गोलंदाजीही मर्यादित असली तरी त्यात वैविध्य आहे. महत्त्वाचे म्हणजे बुमराह भरात येणे संघासाठी अत्यंत आवश्यक होते. शमी, सिराज आहेत पण जे बुमराह डावाच्या सुरुवातीला करू शकतो ते हे दोन्ही गोलंदाज करु शकत नाहीत ते म्हणजे पहिल्या चार फलंदाजांवर वर्चस्व राखणे ते देखील संघात ज्यो रुटसारखा भक्कम फलंदाज असताना सोपे काम नाही. रुटनेही आपला दर्जा सिद्ध करताना शतक फटकावले. या फलंदाजाचे हेच विशेष आहे जिथे बाकी कमी पडतात तिथेच हा धावा करतो. कोहलीने याच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहायला हरकत नाही. रूटने बुमराहसमोर ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती कोहली अँडरसनसमोर का करु शकत नाही.
या सामन्याचे फलित सांगायचे तर बुमराहला दिशा, टप्पा गवसला व त्याच्या तो अवेस्विंगर पुन्हा अवतरला. या मालिकेत भारताचा विजय किंवा पराजय जितका फलंदाजीवर अवलंबून आहे तितकाच तो बुमराहच्या गोलंदाजीवर अवलंबून आहे. शमीचे स्विंग फलदायी आहेतच पण डावाला खिंडार पाडण्याचे काम बुमराहच करत आला आहे व इथेची तेच घडावे हीच अपेक्षा आहे.