नॉटिंगहॅम – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची संधी होती. मात्र, हा दृष्टीपथात असलेला विजय संततधार पावसाने हिरावला व भारतीय संघासह चाहत्यांचाही हिरमोड झाला. या दोन संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना अनिर्णित राहिला.
विजयासाठी आवश्यक 209 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा 1 बाद 52 धावा केल्या होत्या. सलामीवीर लोकेश राहुल 26 धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा हे दोघेही 12 धावांवर नाबाद होते. भारतीय संघाला विजयासाठी आणखी 157 धावांची गरज होती. रविवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी हा सामना जिंकत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची भारतीय संघाला संधी होती. मात्र, सकाळपासून सातत्याने पाऊस होत राहिल्यामुळे खेळच सुरु होऊ शकला नाही. पंचांनी वारंवार खेळपट्टी व मैदानाची पाहणी केल्यावर संपूर्ण दिवसाचा खेळ होणार नसल्याचे जाहीर केले व सामना अनिर्णित राहिला.
बुमराहची अनोखी कामगिरी
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून 9 गडी बाद केले. त्याने ही अनोखी कामगिरी करताना भारताचा माजी कसोटीपटू गोलंदाज जहीर खान याच्याशी बरोबरी केली आहे. बुमराहसह केवळ तीन भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडमध्ये 9 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. यापेक्षा सरस कामगिरी चेतन शर्मा यांच्या नावावर आहे. शर्मा यांनी 1986 साली बर्मिंगहममध्ये 188 धावांत 10 गडी बाद केले होते. जहीर खानने 2007 साली याच नॉटिंगहॅमच्या मैदानावर 134 धावांत 9 गडी बाद केले होते.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड पहिला डाव – 183. भारत पहिला डाव – 278. इंग्लंड दुसरा डाव – 303. भारत दुसरा डाव – 14 षटकांत 1 बाद 52 धावा. (लोकेश राहुल 26, रोहित शर्मा नाबाद 12, चेतेश्वर पुजारा नाबाद 12, स्टुअर्ट ब्रॉड 1-18).