नगर – शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या निलक्रांती चौक ते लाल टाकी, बालिकाश्रम रस्ता परिसरातील अतिक्रमणधारकांवर अतिक्रण विभागाने कार्यवाही केल्यावर देखील पुन्हा अतिक्रमण धारकांनी आधी पेक्षा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अतिक्रमण धारकांनी खो दाखविला आहे. आठवडाभरापूर्वीच अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, लगेचच परिस्थिती जैसे थे झाली आहे. आता पुन्हा मनपा अतिक्रमणधारकांवर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
शहरातील अनेक रस्त्यावर लघु व्यावसायिक, फळ विक्रेते, चहा टपरीवाले, मिळेल त्या जागेवर अतिक्रमण करून दुकान थाटतात. परिणामी, या अतिक्रमणाचा वाहतुकीला त्रास होतो. अतिक्रमण विभागाने कार्यवाही केल्यावर अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले होते. मात्र, पुन्हा अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्यावर आता पुन्हा याठिकाणी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून प्रवाशी त्रस्त झाले आहे.
न्यू आर्ट कॉलेज समोर चहा – टपरी व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली. या टपऱ्यावर चहाच्या निमित्ताने येणारे तरुणांचे जथ्थे कॉलेजात येणाऱ्या विद्यार्थीनींना चिडीमारी करतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे खाजगीत काही विद्यार्थीनींनी सांगितले.
आनंदीबाजार, दिल्ली गेट, चितळे रोड, निक्रक्रांती चौक ते लाल टाकी रोड, बालिकाश्रम रोड या ठिकाणची अतिक्रमण नित्याचीच ठरत आहेत. केवळ मोहिमेपुरते अतिक्रमण हटवले जाते. पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होते. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होऊ शकतात. पायदळी चालणाऱ्या नागरिकांना वाट काढण्यात अडचणी येत असून त्याचा हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस फक्त बघ्याचीच भूमिका घेत असल्याची ओरड नागरिकामध्ये आहे.
महापालिकेने शहरात अतिक्रमण मोहीम राबवली आहे. शहराच्या विविध वर्दळीच्या भागात अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही करण्यात आली. परंतु ही कारवाई दोन दिवसासाठीच होती का ? हा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अतिक्रमण धारकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक केवळ अतिक्रमण हटवण्याचे नाटक करते.
हातगाड्या हलवा, दुकाने उचला, टपऱ्या हटवा… असा आवाज देत अतिक्रमण धारक विभागाचे कर्मचारी आधीच अतिक्रमण धारकांना सावध करतात. दोन दिवस आधीच अतिक्रमण धारकांना अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अलर्ट करतात. त्यामुळे अतिक्रमणधारक तात्पुरत्यासाठी आपले बस्तान हलवतात आणि पुन्हा अतिक्रमणाच्या जाग्यात आपला धंदा करतात.