गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ : कारणे सांगून परत पाठविले जातात पीडित
गुन्हेगारीकडे डोळे झाकून गुन्हेगाराचा आलेख कमी करण्याचा प्रयत्न
पिंपरी – पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रार घेणे पोलिसांना कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, गुन्हे दाखल करण्याऐवजी ते कसे टाळता येतील, याकडे पोलिसांचा कल अधिक असल्याचे दिसून येते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांच्या या वागणुकीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपल्या भागात जास्त गुन्हेगारी नाही हे दाखविण्यासाठी गुन्हेगारीकडेच पाठ फिंरविण्याची आणि तपासातून स्वत:ची सुटका करून घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न गुन्हेगारीला सध्या खतपाणी घालत आहेत.
गुन्ह्यांच्या निर्गतीचे प्रमाण अतिशय कमी असल्याने मासिक क्राईम मिटींगमध्ये पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ निरीक्षकांचे भर बैठकीत कान टोचले. यामुळे प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. मात्र दुसरीकडे गुन्हे दाखल करून घेण्याचे प्रमाणही खाली घसरले आहे. माजी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचे दरवाजे नागरिकांसाठी खुले असल्याने नागरिक त्यांची थेट भेट घेऊन त्यांना आपली तक्रार सांगू शकत होते.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सौजन्याची वागणूक द्या, असे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. सौजन्याची वागणूक तर सोडा, पण तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांवरच गुन्हेगारांप्रमाणे प्रश्नांची सरबत्ती केली जात असल्याचे सध्या दिसून येत आहे. गुन्हा दाखलच होऊ नये म्हणून तक्रारदाराला वेगवेगळ्या प्रकारे भिती दाखविली जाते. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या पालकांनाच “तुम्हाला तुमच्या पोरीवर लक्ष ठेवता येत नाही का, आता कशाला आदळआपट करता.’ असे सुनावले जाते.
वाहन चोरीचाही गुन्हा त्वरीत दाखल न करता तुम्ही शहरात शोध घ्या, नाही मिळाले तर गुन्हा दाखल करू, असा सल्ला देऊन बोळवण केली जाते. वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी हा अजब फंडा शोधून काढला आहे. वाहन चोरीचे गुन्हे तर आठवडा ते दहा दिवसांनी दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठीही नागरिकांना पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागतात.
“तर न्यायालयातून दागिने सोडवावे लागतील’
दळवीनगर, चिंचवड येथे एका ठिकाणी घरफोडी झाली. गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित कुटुंबीय पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत होते. आरोपी सीसीटीव्हीत कैद झालेत. गुन्हा दाखल केल्यावर तुम्हाला न्यायालयातून दागिने सोडवावे लागतील. मात्र क्राइम मिटींग झाल्यावर गुन्हा दाखल करू, असे पोलिसांनी त्या कुटुंबाला सांगितले. खूप पाठपुरावा केल्यानंतर आठ दिवसांनी गुन्हा दाखल केला.
“तुमच्याच मुलीला भविष्यात अडचण येईल’
पिंपरी येथील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेले. कुटुंबाने पाठपुरावा केल्यानंतर त्या मुलीला पोलिसांनी शोधून काढले. त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. मात्र गुन्हा दाखल केल्यास त्या मुलीला भविष्यात अडचण होईल. लग्न झाल्यावर तिला न्यायालयात यावे लागेल, अशी भिती दाखवत गुन्हा दाखल करण्याचे टाळले.
“बालविवाहाचा गुन्हा दाखल करणे आमचे काम नाही’
साने चौक, चिखली येथील एका 14 वर्षीय मुलीचा विवाह सूस येथे झाला. याबाबतची माहिती त्याच दिवशी वुमेन्स हेल्पलाइन या संघटनेला मिळाली. त्यांनी याबाबत कारवाईसाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र हे काम आमचे नाही, असे सांगत चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. याबाबत वुमेन्स हेल्पलाइनने पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.