कामगारांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेण्याची मागणी
सातारा (प्रतिनिधी) – साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योग बंद पडले असून कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंत्राटी कामगार पद्धत बंद करून कायमस्वरूपी भरती करावी, बंद कंपन्यांचे प्लॉट नवोद्योजकांना द्यावेत, बजाज कंपनी पुन्हा सुरू करून एमआयडीसीला गतवैभव मिळवून द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसच्या कामगार सेलचे अध्यक्ष पै. हरिभाऊ लोखंडे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक घेण्याची ग्वाही आ. चव्हाण यांनी दिली.
येथील कॉंग्रस भवनात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात लोखंडे यांनी कामगार प्रश्नाकडे आ. चव्हाण यांचे लक्ष वेधले. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती साहेबराव जाधव, अनुसूचित सेलचे अध्यक्ष मनोजकुमार तपासे, विराज लोखंडे व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
माथाडी कामगारांना शासन नियमानुसार रजा मिळावी, त्यांच्या मुलांना अनुकंपा तत्त्वावर कामावर घ्यावे. अनेक कंपन्यांमध्ये कामगारांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन दिले जात नाही. कंत्राटी पद्धतीने कामगारांचे नुकसान होत आहे. साताऱ्याच्या औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. नवीन एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी घेऊन त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, अशा मागणी लोखंडे यांनी केल्या. कामगारांचे न्याय्य हक्क व जिल्ह्याचा औद्योगिक विकास गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.