मुंबई – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्राद्वारे केली होती. नाना पटोले यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.
भाजपने पत्र लिहून केलेल्या तक्रारीवर प्रसारमाध्यमांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी म्हटले, भाजपच्या पत्रावर उचित कारवाई करावी हा माझा रिमार्क आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याची चौकशी होईल. जर तथ्य असेल तर कारवाई होईल. तसेच यामध्ये जर काहीही तथ्य न आढळल्यास ते प्रकरण त्या पातळीवर निर्गत केले जाते, असा खुलासाही त्यांनी केला.
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेही निवेदनाद्वारे केली होती.