नवी दिल्ली – स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे नेणाऱ्या अमृतकाळाच्या प्रारंभिक वर्षांत आज देश उभा आहे. हा युगांतरकारी परिवर्तनाचा काळ आहे. देशाला नवनव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी आपल्याला देण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दीपूर्तीपर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकावरच्या अत्यावश्यक जबाबदाऱ्या आहेत, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करताना म्हणाल्या.
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुर्म म्हणाल्या, प्रजासत्ताकाचे 75 वे वर्ष म्हणजे, अनेक अर्थांनी- एखाद्या देशाच्या प्रवासातला खरोखरच एक ऐतिहासिक मैलाचा दगड. विशेषतः हा क्षण साजरा करण्याजोगा आहे, कारण इतक्यातच- म्हणजे स्वातंत्र्याची 75 वर्षं पूर्ण करताना स्वातंत्र्याच्या महोत्सवादरम्यान आपण आपल्या देशाचे अनन्यसाधारण श्रेष्ठत्व आणि वैविध्यपूर्ण संस्कृती साजरी केली.
सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा नुकताच समारोप झाला. कर्पूरीजी हे मागासवर्गीयांच्या सर्वात महान समर्थकांपैकी एक होते आणि त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे आयुष्य हा एक संदेश होता.
याच आठवड्याच्या सुरुवातीला आपण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानी बांधलेल्या नवीन भव्य मंदिरात स्थापित मूर्तीच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार झालो.
या घटनेकडे व्यापक दृष्टीने पाहता, आपल्या सांस्कृतिक वारशाचा सातत्यपूर्ण पुनर्शोध घेण्याच्या भारताच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा म्हणून भावी इतिहासकार या प्रसंगाकडे बघतील. उचित न्यायप्रक्रिया पार पाडून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या मंदिराची निर्मिती सुरु झाली. आता केवळ जनतेच्या श्रद्धेची अभिव्यक्ती म्हणून नव्हे, तर लोकांच्या न्यायप्रक्रियेवरच्या प्रचंड विश्वासाचं द्योतक म्हणून आता ही भव्य वास्तू उभी राहिली आहे.
ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील देशांचा आवाज म्हणून भारताच्या उदयाला जी-ट्वेन्टी शिखर परिषदेने चालना दिली. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चेमध्ये एका महत्त्वाच्या घटकाची भर घातली. तसेच संसदेने ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक पारित केल्यावर, स्त्री-पुरुष समानतेच्या आदर्शाच्या दिशेने आपण आणखी प्रगती केली. नारी शक्ती वंदन अधिनियम हे स्त्री-सक्षमीकरणाचं क्रांतिकारी साधन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.