Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी विजेता (Bigg Boss Ott Winner) एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान एल्विश यादवसह (Elvish Yadav) सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याच प्रकरणावरून महाराष्ट्र काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण गणपतीत एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर एल्विश यादव आला होता. त्याने गणपतीची आरतीही केली होती याचे फोटो शेअर करत विरोधकांनी टीका केली आहे.
राज्यातील काँग्रेसने ,”मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर (Maharashtra CM Bungalow Varsha) एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का?” असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य करण्यात आले. शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होत. त्याच्यावर सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्स चे सेवन विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादव सारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का? आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत. ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षावर नशाबाज आरती करतो हे महायुती सरकार आहे,”असे त्यांनी म्हटले आहे.
तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात विषारी सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन गणपती आरतीला बोलावले होते. आता नोएडा पोलिसांनी विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेंचे वर्षा बंगल्यावरील फोटो आले होते. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा संतप्त सवाल अतुल लोंढेंनी सरकारला केला आहे.