- आमदार सुनील शेळके : योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची घाई कशाला ?
देहूगाव – तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत तीर्थक्षेत्र देहूगाव येथे तयार करण्यात आलेले बंदिस्त गटार योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची घाई कशाला?, नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करा, योजनेतील त्रुटी त्वरित दूर करा, अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
भूमिगत बंदिस्त गटार योजनेमध्ये नागरिकांच्या अनेक समस्या असल्याने त्याचे निराकरण व चर्चा करण्यासंदर्भात देहू राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बैठकीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आमदार शेळके यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता एस. डी. पाठक, शाखा अभियंता धनंजय जगधने, उपसरपंच स्वप्नील काळोखे, रत्नमाला करंडे, हेमा मोरे, उषा चव्हाण, सुनीता टिळेकर, राणी मुसूडगे, दिनेश बोडके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश हगवणे, माजी सरपंच कांतिलाल काळोखे, सुनील कडूसकर, भरत काळोखे, विशाल परदेशी, निलेश मोरे, प्रदीप काळोखे, सोमनाथ चव्हाण, अमित घेनंद, राजू शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत 2011 मध्ये 18 कि.मी. अंतराचे 20.85 कोटी रुपये प्रास्ताविक खर्चाचा भूमिगत बंदिस्त गटार योजनेचा आराखडा शासनाने मंजूर केला होता. मार्च 2015 मध्ये प्रत्यक्षात या कामाला सुरुवात करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीने आणखीन 12 कि.मी. अंतराची भूमिगत पाईपलाइन वाढविण्यात येऊन 30 कोटी खर्चाचे योजना पूर्ण करण्यात आले. भूसंपादन, रस्ता, नागरिकांच्या समस्या अशा विविध अडचणी, प्रशासनासह विविध कामातील समन्वयाचा अभाव, वर्षातील तीन वेळा भरणाऱ्या यात्राचा सामना करीत साडेपाच वर्ष योजनेचे काम सुरू होते, 2020 जानेवारीमध्ये ही योजना सुरू करण्यात आली.
सहा महिने ठेकेदाराकडून योजना चालविल्यानंतर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले. 30 जून अखेर सहा महिन्याची मुदत संपल्याने जुलै व ऑगस्टमध्ये पुन्हा पत्र देण्यात आले.
योजनेतील काही ठिकाणी चेंबरचे अर्धवट काम असून, नागरिकांच्या घरातील सांडपाण्याचे पाईप चेंबरला जोडलेली नाही, काही ठिकाणी रस्ता व जमिनीला चेंबर समांतर नाही, काही ठिकाणी चेंबर जमिनीत रस्त्यात झाकून (गाढले) गेले आहेत. भूमिगत पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेले अनेक ठिकाणी रस्ते नादुरुस्त आहे. चेंबर तुंबल्याने सांडपाणी शेतात, रस्त्यावरून वाहत आहे, अशा विविध त्रुटीचा पाढा वाचत योजना अपूर्ण असल्याचे आणि योजनेचा नकाशा व अहवालाची कागदपत्रे ग्रामपंचायतीला मिळाले नसल्याने हस्तांतरित करून घेण्यास ग्रामपंचायतीने विरोध केला आहे.
भूमिगत बंदिस्त गटार योजना पूर्ण झाली असून, 1 जानेवारी रोजी मलनि:स्सारण शुध्दीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या असणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. योजनेतील भूमिगत गटार तुंबणे व त्याचे दुरुस्ती संदर्भात तक्रारी येणार आहेत. ते वेळोवेळी दुरूस्त करावी लागणार आहे. अनेक नागरिकांनी घरातील सांडपाण्याचे पाईप थेट चेंबरला स्वतः जोडत आहेत, त्यामुळे चेंबर नादुरुस्त झाल्याने दगड, विटा, माती, मुरूम चेंबरमध्ये पडलेले आहेत, तर अनेक नागरिक वेस्टेज मटेरियल, कचरा, खराब कपडे चेंबरमध्ये टाकत असल्याने चेंबर तुंबत आहेत. नागरिकांनी सार्वजनिक मालमत्ता ही आपली मालमत्ता समजून जोपासली पाहिजे, प्रशासनानेही अशा नागरिकांवर कारवाई केली पाहिजे.
– धनंजय जगधने, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण