आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे-पडवळ येथील घटना
मंचर -महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील बेंड वस्तीवरील अनिल चांगदेव चासकर यांच्या गोठ्यातील शेळ्यांवर मंगळवारी दि. 24 ) पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करुन पाच शेळ्या, पाच बकरे, एक बकरु उसाच्या शेतात फरफटत नेऊन एकूण अकरा जनावरे ठार केली आहेत. त्यामुळे शेतकरी अनिल चासकर यांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाच मृत शेळ्यांपैकी तीन गाभण शेळ्या ठार झाल्या.सर्व ऑस्टेलियन बोर जातीची पाळीव जनावरे होती. ऑस्टेलियन बोर जातीच्या शेळ्या महागड्या आहेत. शेळ्यांचा गोठा आठ फूट तार जाळी लावून बंदिस्त असतानाही बिबट्याने आतमध्ये प्रवेश करुन शेळ्या ठार केल्या. तसेच एक बकरु उचलून नेऊन पलायन केले. शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून अनिल चासकर यांना जाग आल्यानंतर त्यांनी लाईट लावून आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
घटनास्थळी पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी जे.व्ही.पाचपुते, प्रकाश शिंदे यांनी करुन अहवाल वन विभागाकडे वर्ग केला आहे. वनअधिकारी कैलास दाभाडे, नारायण आरुडे, मल्हारी चासकर, गणेश आवटे, मुकुंद बारवे, मयूर पडवळ, दामू पडवळ, पप्पू चिखले, पोलीस पाटील सविता पडवळ, ऋषभ चासकर, वनमजूर हरिभाऊ डोके यांनी घटनास्थळी भेट दिली.
बेंड वस्ती येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी पं. समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, सरपंच अनिल सैद, उपसरपंच सुलोचना पडवळ यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
राणूबाई मंदिरानजीक प्रभाकर दाजी मावकर यांच्या चिकूच्या बागेत बछड्यांसह बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. शिवाजी श्रीपती मावकर, कैलास मावकर यांनी बिबट्याला पाहिले आहे. त्यामुळे रात्री या भागात शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी धजावत नाहीत. परिसरात उसतोड सुरू झाल्याने बिबट्याचे दिवसाही दर्शन होत आहे.
– ज्ञानेश्वर माळी, ऊसतोड कामगार.
लौकी येथील पाचघरवस्ती परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने नुकताच पिंजरा लावला आहे. लौकी-थोरांदळे रस्त्यावर बिबट्याच्या बछड्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला, त्यामुळे बिबट्याची मादी सैरभैर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. त्याची दखल घेऊन वनखात्याचे कर्मचारी नारायण आरुडे, वनरक्षक कल्पना पांढरे, वनसेवक कोंडीभाऊ डोके यांनी येथे पिंजरा लावला आहे. बिबट्याला सावज म्हणून शेळी ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. नितीन थोरात, विशाल थोरात, कैलास थोरात, दीपक थोरात व सौरभ थोरात यांनी पिंजरा आणण्यासाठी मदत केली.