पुणे : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची लढत रंगणार आहे. स्पर्धेतील सलग दोन पराभवांमुळे ‘क’ गटात अव्वल दोनमध्ये राहण्यासाठी महाराष्ट्राला प्रत्येक लढत जिंकणे आवश्यक आहे.
मागील दोन्ही लढतीत महाराष्ट्राच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे कर्णधार नैशाद शेखची चिंता निश्चित वाढली असेल. पण अनुभवी फलंदाज केदार जाधवचे संघात आगमन होत असून त्यामुळे संघाची ताकद निश्चित वाढली आहे.
दरम्यान, सलामीच्या लढतीत महाराष्ट्राला हरयाणाकडून एक डाव अन् ६८ धावांनी तर दुस-या लढतीत जम्मू-काश्मीरकडून ५४ धावांनी पराभव स्विकाराव लागला होता. दुसरीकडे छत्तीसगडलाही पहिल्या लढतीत ओडीशाकडून एक डाव अन् ३ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता . मात्र त्यानंतर दुस-या लढतीत छत्तीसगडने उत्तराखंड संघावर एक डाव अन् ६५ धावांनी विजय मिळवला होता.