शेवगाव (प्रतिनिधी) – तालुक्यात विहिरीवरील विद्युत मोटारीच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी तर निर्जन रस्त्यावरील आडवा-आडवी व भुरट्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
यावर्षी निसर्गाने सर्वत्र कृपा केली आहे. तालुक्यात सर्वदूर पाऊस रोजच हजेरी लावत आहे. अचानक येणाऱ्या पाऊसामुळे शेतातील शेतमाल, महत्त्वाच्या चीजवस्तू सुरक्षित स्थळी हलविण्यास शेतकऱ्यांना अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे भुरट्या चोरट्यांचे फावले आहे.
परिसरातील रस्त्यालगतच्या शेताच्या विहिरीवरील विद्युत मोटारी, शेतात खुडून पडलेल्या बाजरीची कणसे चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाने रस्ते मोकळे असतात, अशावेळी चोरटे रस्त्या लगतच्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंप राजरोसपणे उचलून पोबारा करतात . काही चोरटे तर बोअर मधील विद्युत पंपही वर खेचून चोरून नेत आहेत. गेल्या पंधरा दिवसात शेवगाव नेवासे राज्य मार्गावरील अनेकांच्या मळ्यातील पंप चोरीला गेल्याच्या घटना घडत्या आहेत. पावसामुळे चोरट्यांचा मागही रहात नाही. अशा घटना जवळपास परिसरात रोजच घडत आहेत .या चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने बहुतेक तक्रारी दाखल करण्यात येत नाहीत.
करोना महामारीला रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून उद्योगधंदे,कारखानदारी लॉक डावून मुळे बंद झाल्याने खेडोपाडी बेकारांची फौज वाढली आहे . हाताला काम नाही ,मात्र पोटाची आग शांत बसू देत नाही अशा स्थितीत किरकोळ चोर्या होत आहेत . त्यातूनच रस्त्याने एकट्या-दुकट्या प्रवाशाला आडवायचेही प्रकार घडत आहेत . अशा वेळी फारशी हाणमार न करता खिशातील रोकड तेवढी घेऊन पसार होण्याचे प्रकार घडत आहेत . ज्याला लुटले जाते त्याच्या खिशातही फारशी रक्कम नसतेच ! मात्र दोघांच्याही द्रुष्टीने ती रक्कम मोठीच असते ! अशी आजची स्थिती आहे .