कोलकाता – पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत झालेल्या हिंसाचाराबद्दल माहिती घेण्यासाठी राज्यपाल डॉ. सी.व्ही. बोस यांनी राज्याचेमुख्य निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा यांना राजभवनात पाचारण केले आहे.
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भांगोरेत मोठा हिंसाचार झाला असून तेथे चार जणांचा बळी गेला आहे. त्या भागाला राज्यपालांनी भेट दिली आहे. निवडणूक यंत्रणेनेही हा हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे असे राज्यपालांनी म्हटले आहे.
राज्यपालांनी भांगोरे भागातील स्थानिक रहिवासी आणि वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही चर्चा करून वस्तुस्थितीची माहिती करून घेतली. राज्यात कोणत्याही स्थितीत हिंसाचार सहन केला जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगाल मध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये सुमारे 74,000 उमेदवार निवडून देण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत निवडणुक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यात 5 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत.