मंचर – आंबेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वॉर्डवॉर्डात वेळोवेळी जेवणावळी देत असून दारू, मटण, बिर्याणीला मागणी चांगलीच वाढली आहे. आंबेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. उमेदवारांचेकडून हायटेक प्रचार सुरू असून उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी देण्यावर भर देत आहेत.
अनेक उमेदवारांनी मतदारांच्या खाण्या-पिण्याची सोय केली आहे. प्रत्येक वॉर्डानुसार व्हेज-नॉनव्हेज जेवणाचे नियोजन केले जात असून, अनेकांना दारू, चिकन, मटण, बिर्याणी पार्सलद्वारे घरपोच पुरवली जात आहेत, तर अनेक मतदारांच्या मुलांना नोकरीचे, कामधंद्याचे आश्वासन दिले जात आहे. रात्रीच्यावेळी ढाबा, हॉटेल याच्यावर कार्यकर्त्यांची गर्दी पाहावयास मिळत आहे. दिवाळीजवळ आल्याने आणि निवडणुकीमुळे अनेक मतदारांची दिवाळी गोड होणार आहे.
अनेक उमेदवारांकडून चिन्ह असलेल्या वस्तू वाटल्या जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एका एका मताला किंमत असल्याने मतदारांचे लाड पुरवले जात असून त्यांचे मन राखण्यासाठी उमेदवार मनमोकळे करून खर्च करत आहे. बिर्याणी, बकऱ्याच्या मटणाला अधिक पसंती निवडणुकीच्या धामधुमीत मतदारांकडून उमेदवाराकडे बकऱ्याच्या मटणाची, बिर्याणीची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
उमेदवारही मतदारांनी नाराज होऊ नये म्हणून वॉर्डनुसार बकराच्या मटणाच्या पार्टी देत आहे. उमेदवाराचा प्रचार करणारे कार्यकर्ते दररोज रात्री चिकन, मटण, बिर्याणी या विविध पदार्थांवर मनसोक्त ताव मारत आहेत.
प्रतिष्ठा पणाला
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून येणाऱ्या 5 तारखेला मतदान होणार आहे, तर 9 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 30 ग्रामपंचायतीपैकी काही ठराविक ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहेत. मात्र, काही ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदांसाठी अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचाराच्या रणधुमाळीला गती आली आहे.