मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘मी पुन्हा येईन’ या आशयाचे ट्वीट भाजपकडून शेअर करण्यात आले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येण्यास सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र यावरून विरोधकांवरून टीका होण्यास सुरूवात झाल्यानंतर तातडीने हे ट्वीट डिलीट करण्यात आले. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांचे स्वागत करतो, असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, “जर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. कारण ते किमान कायदेशीर मुख्यमंत्री असतील. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार नाही. सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर ताशेरे उडलेले नाहीत. जर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे आणि ते देवेंद्र फडणवीस असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू.”
पुढे ते म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे. एकनाथ शिंदे यांना लवकरच मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे तो मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो.”
2024 ला विकृतीचा अंत होईल – संजय राऊत
शरद पवारांच्या टीकेवरून बोलताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांवरील टीका ही विकृती आहे 2024 ला या विकृतीचा अंत होईल. पवार कृषीमंत्री नव्हते तेव्हापासून पवारांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. पवारांना शेतीच्या कार्यासाठी पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आली आहे. पवारांनी नेहमी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला आहे. शिंदे, अजित पवारांपेक्षा गुलाम बरे अशी स्थिती करून ठेवली आहे. शरद पवारांवर टीका होत असताना अजित पवारांनी निघून जायला पाहिजे होते. आज शरद पवारांवर टीका केली उद्या बाळासाहेबांवर टीका करतील.”