eknath shinde – घरात बसून काम करणाऱ्या व केवळ घोषणा करणाऱ्यांनी आमच्यावर टीका करु नये. ज्या लोकांना काहीच काम उरले नाही. ते आता सकाळी उठून टीकाच करणार आहे. बाळासाहेबांचे (balasaheb thackeray) संस्कार विसरलेले लोक त्यांना मी कामातूनच उत्तर देईल, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर पलटवार केला.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ‘नालायक’ असा उल्लेख करत त्यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात चांगलाच वाद रंगला. तर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली. शेतकऱ्यांच्या नुकसानाला सर्व मंत्र्यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
यापूर्वीदेखील सरकारने जेव्हा अवकाळी आणि गारपीट झाली तेव्हा मदत केली आहे. यावेळेसही दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टरच्या क्षेत्राफळाला शासनाकडून मदत होईल. सगळ्या पंचनामाचा एकत्रित आढावा घेतल्यानंतर मदत तात्काळ दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करू नये !
या आधीचे सरकार केवळ घोषणा करणारे होते. शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाणी पुसणारे होते. परंतू आमच्या सरकारने त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कायम पाठिशी राहिलेले आहे. तर आत्ता आलेल्या अवकाळीच्या संकटात देखील आम्ही २ हेक्टरवरुन ३ हेक्टरवर निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहितीही शिंदेंनी यावेळी दिली.
तसेच, मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. भुजबळ यांची देखील तेच मागणी आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करुन घेऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.