जळगाव – ”सध्या भाजपात जे लोक प्रवेश करत आहेत ते साधुसंत नाहीत. सत्तेत जो कोणी असतो त्यांच्याकडे येण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत. तसचे भाजपात या नेत्यांचे पक्षप्रवेश होण्यापूर्वी त्यांना वॉशिंग पावडरने धुतलं जातं. क्लीन केलं जातं मग पक्षात घेतलं जात”. अशा शब्दात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
ते म्हणाले की, कोणीही विचार, तत्व पाहून पक्षात प्रवेश करत नाही तर भाजपात प्रवेश करण्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. कोणाला पदाची अपेक्षा असते तर कोणाला सत्तेचं संरक्षण हवं असतं त्यामुळे सध्या हे नेते मोठे प्रमाणात सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहे. त्याचसोबत नारायण राणेंना भाजपात घेण्यासाठी शिवसेनेच्या दबावाला झुकण्याचं कारण नाही. कोणाला पक्षात घ्यावं हा भाजपाचा निर्णय आहे. छगन भुजबळांना शिवसेनेत घ्यावं की नाही हे भाजपा ठरवू शकत नाही तर राणेंना भाजपात घ्यावं की नाही हा निर्णय भाजपाचा आहे. शिवसेनेचा नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे त्यामुळे राणेंना पक्षात घेण्यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही असं खडसेंनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सद्य परिस्थिती बद्दल खडसे म्हणाले 1978 साली शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांना सोडून वेगळी चूल निर्माण केली. त्या काळात जे घडत आहे तेच आज घडत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हे नवीन नाही. त्यांच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.