आरोग्याच्या उद्भवू शकतात समस्या: घराबाहेर पडताना काळजी घ्या
पुणे – शहरातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांना बाहेर संचार करण्याची सूट मिळाली आहे. मात्र, असे करताना नागरिकांनी पूर्ण काळजी घेतली पाहिजे. कारण विषाणूबरोबरच वातावरणातील अतिनील किरणांचा प्रभावही वाढत आहे. शहराच्या विविध भागांत हा प्रभाव धोकादायक स्तरावर असून, या किरणांच्या अधिककाळ संपर्कात आल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
राज्यातील उष्णता लाटेमुळे सुर्याच्या अतिनील किरणाचा प्रभाव वाढला आहे. आयआयटीएम-सफर संस्थेतर्फे अतिनील किरणांबाबत घेतलेल्या नोंदीनुसार, मानकानुसार वातावरणातील अतिनील किरणांचे प्रमाण 3 नॅनोमीटर इतके असल्यास ते हानीकारक ठरत नाही. मात्र, सध्या शहरात अनेक ठिकाणी हे प्रमाण 4.6 ते 7 नॅनोमीटर इतके आहे. अशावेळी जास्तकाळ अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने त्वचा काळी पडणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचेची, डोळ्यांची आघ होणे याबरोबरच कॅन्सरसारखा गंभीर आजारही उद्भवत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
काय काळजी घ्याल…
– घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे.
– हात, पाय, तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची काळजी घ्यावी
– उन्हापासून सुरक्षेसाठी डोळ्यांवर चष्मा, गॉगल घालावा.
– शक्यतो उन्हामध्ये घराबाहेर पडणे टाळावे.