भारतातील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती कधीही कोणत्याही विषयावर भूमिका घेत नाहीत किंवा व्यक्त होत नाहीत असा आक्षेप नेहमीच घेतला जात असला, तरी या सर्व आक्षेपांना छेद देणारी टोकाची भूमिका सध्या बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत हिने घेतली आहे. सध्या ज्याप्रकारे ती व्यक्त होत आहे ते पाहता मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लोकांनी व्यक्त न होणेच चांगले असा निष्कर्ष कोणी काढला, तर आश्चर्य वाटायला नको.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंगनाच्या बाष्कळ बडबडीचे समर्थन विक्रम गोखले यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यानेही केले असल्यामुळे या सर्व लोकांकडून समजूतदारपणाच्या अभिव्यक्तीची अपेक्षा करणे चूकच ठरणार आहे. भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आणि खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले, असे वक्तव्य करून स्वत: वाद ओढवून घेणाऱ्या कंगनाने काल परत एकदा अतिशय विचित्र विधाने करून या वादात तेल ओतण्याचे काम केले आहे.
कंगनाने महात्मा गांधीजी यांना टार्गेट केले असून महात्मा गांधी यांनी कधीही नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा भगतसिंग यांच्या सारख्यांना पाठिंबा दिला नाही असे विधान केले आहे. कंगनाच्या या विधानानंतर प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला असला तरी महात्मा गांधी यांनी आयुष्यभर जी दोन तत्त्वे जपली त्या तत्त्वांच्या आधारे म्हणजेच सत्य आणि अहिंसेच्या आधारेच कंगनासारख्या बाष्कळ बडबड करणाऱ्या व्यक्तींना उत्तर द्यावे लागणार आहे.
गांधी आज हयात असते तर त्यांनी कंगनाला माफ करावे अशी अपेक्षा व्यक्त केली असती. त्यामुळे गांधीजींच्या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनीच लोकशाही मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने कंगनाचे तोंड बंद करण्याची गरज आहे. स्वातंत्र्यलढ्याचा खरा इतिहास माहीत नसल्याने ज्या गोष्टी सोशल माध्यमांवर फिरत असतात त्याच खऱ्या मानून त्यावर व्यक्त होणारी जी नवी पिढी आहे त्याच पिढीचे प्रतिनिधित्व करणारेच गांधीजी किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा भगतसिंग यांच्याबाबत अशी विधाने करतात.
गांधीजी यांनी कधीच हिंसेचे समर्थन केले नाही. आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा वाद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही. क्रांतिकारी कृत्ये आणि महात्मा गांधी यांच्या मवाळवादाने केलेली शांततापूर्ण आंदोलने याचा एकत्रित परिणाम म्हणूनच ब्रिटिश हा देश सोडून गेले हाच इतिहास आहे आणि हेच वास्तव आहे. जे आतापर्यंत सर्वांना शिकवण्यात येत आहे. असे असतानाही स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात भगतसिंग आणि इतर क्रांतिकारक किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे.
असे भासवण्याचा कंगनाचा प्रयत्न आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. कारण भारतातल्या कोणत्याही राज्यात शिकवला जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या सर्व व्यक्तींचा योग्य उल्लेख आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी यांनी ज्या अहिंसावादी तत्त्वांचा पुरस्कार केला त्याचा स्वीकार जगातील जवळपास सर्वच देशांनी केला आहे. म्हणूनच महात्मा गांधी आज जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखले जातात.
या गोष्टींची कल्पना नसल्याने अशा प्रकारची विधाने करत असेल तर कंगनाला पुन्हा एकदा इतिहासाची पुस्तके पाठवून तिच्याकडून इतिहासाचा अभ्यास करून घ्यावा लागणार आहे. भाजपच्या नेत्यांनी कंगनाला समजावले नाही, तर कंगना जे काही बोलते त्याला भाजपाचा पाठिंबा आहे असेच जनमानसात प्रतीत होईल. हा धोकाही भाजपाच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवा. काही व्यक्तिमत्त्वे जसे मोदी सरकार विरोधात बोलण्यास घाबरत नाहीत तसेच कंगनासारख्या अनेक व्यक्ती अशा आहेत ज्या नेहमी मोदी सरकारची स्तुती करत असतात.
पण जर विनाकारण एखादा वाद ओढवून घेत असतील तर भाजपनेही कंगनाला समज देण्याची गरज आहे. एखाद्या व्यक्तीची किंवा तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची किंवा तत्त्वज्ञानाची कुचेष्टा करण्याची काहीच गरज नसते. हे कंगना आणि काही तत्सम लोकांना सांगण्याची गरज आहे. बॉलीवूडमधील आपल्या अगदी छोट्याशा कारकिर्दीमध्ये क्वीन सारखे चित्रपट करून लोकप्रिय झालेल्या कंगनाने गेल्या काही दिवसांमध्ये मात्र बडबड करून भाजपचे लक्ष वेधले आहे.
तिच्या अल्प कारकिर्दीचा सन्मान म्हणून मोदी सरकारतर्फे तिला पद्मश्री जरी देण्यात आला असला तरी पुरस्काराचा योग्य सन्मान ठेवण्याचे काम तिच्याकडून होत आहे असे वाटत नाही. त्यामुळे तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी मागणी केली जात असेल तर त्यात चुकीचे काही नाही. गांधीजी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या लोकोत्तर पुरुषांवर टीका करून आपली प्रतिष्ठा वाढेल असा जर गैरसमज कंगनाच्या मनात असेल तर तो आताच काढून टाकायला हवा.
कारण गांधीजी किंवा तत्सम काही नेत्यांची प्रतिमा भारतीयांच्या मनात कोरली गेली आहे. त्यामुळे गांधीजी किंवा इतर नेत्यांची प्रतिमा खराब करण्याचे काम जर काही व्यक्ती करत असतील तर त्यांना यश मिळणार नाही हे उघड आहे. पण विनाकारणच वादविवाद निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही हे लक्षात घेऊनच आता भविष्यात अशा प्रकारची विधाने करण्याचे धाडस कंगना करणार नाही याची काळजी आता सरकारला घ्यावीच लागेल.