-हेमंत देसाई
भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते संबित पात्रा हे अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि टिप्पण्यांमुळे चर्चेत असतात. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हे पात्रा नावाचे गृहस्थ प्रसिद्धीस आले आणि थयथयाट करू लागले.
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि पूर्वाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणे आणि अन्य धर्मीयांबद्दल विद्वेषयुक्त विधाने करणे, ही पात्रा यांची स्टाइल आहे. केंद्र सरकारने कोविड 19 बाबतची कामगिरी अत्यंत अयोग्य पद्धतीने हाताळल्याबाबत कॉंग्रेसने टूलकिट तयार केल्याप्रकरणी भाजपने ट्विटर संदेश टाकला होता. त्याविषयी ट्विटरने आक्षेप घेत, “तथ्य नसलेली बाब’ या गटात तो अंतर्भूत केला होता. त्यावर सरकारने म्हटले आहे की, एखाद्या प्रकरणात चौकशी सुरू असताना त्याबद्दल ट्विटर त्यांचे मत लादू शकत नाही. त्यामुळे हा संदेश तथ्यहीन आणि कपोलकल्पित असल्याच्या वर्गवारीतून मागे घेतला जावा, अशा सूचना सरकारने ट्विटरला दिल्या आहेत.
संबित पात्रा यांनी कॉंग्रेसचे टूलकिट हे मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठीच आहे, अशी टिप्पणी केली होती. त्यावर ट्विटरने हा संदेश, त्यातील व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप व प्रतिमा यासह तथ्यहीन असल्याचे म्हटले होते. ट्विटरच्या या पवित्र्यानंतर कॉंग्रेसही आक्रमक झाली. “भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची ट्विटर खाती निलंबित केली जावीत. ते चुकीची माहिती पसरवून समाजात अशांतता निर्माण करत आहेत. भाजपने खोटी कागदपत्रे समाजमाध्यमातून पसरवली असून, त्याबाबत कारवाई करावी’, असे कॉंग्रेसने ट्विटरला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. छत्तीसगडमध्ये याबाबत कॉंग्रेसने पोलिसांत तक्रारदेखील केली आहे.
याउलट, कॉंग्रेसच भाजप व मोदी यांच्यावर चिखलफेक करत असल्याचे भाजपचे मत आहे. करोनाची साथ सुरू असताना कॉंग्रेसने त्यांचे मित्र पत्रकार व इतरांच्या माध्यमातून तसेच टूलकिटद्वारे सरकारविरोधी जनसंपर्क मोहीमच चालू केली आहे, असे पात्रा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. याचा अर्थ, कॉंग्रेस आणि भाजप यांनी एकमेकांविरुद्ध आरोपसत्र जारी ठेवले आहे. याबाबत सरकारने उघडउघड पक्षपाती भूमिका घेतली असून, ट्विटरने मर्यादा ओलांडून अनाठायी कृती केल्याचे ताशेरे ओढले आहेत. टूलकिटप्रकरणी संबंधित व्यक्तींकडून तक्रार करण्यात आली असून, त्याची शहानिशा व चौकशी सुरू आहे. तेव्हा ट्विटरने उगाचच आगाऊपणा करू नये, असेच सरकारचे मत दिसते.
हा प्रश्न सर्वोच्च पातळीवरून तडीस न्यावा, असे आवाहन भाजप श्रेष्ठींनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना केले आहे. ट्विटरच्या कारवाईमुळे भाजपच्या बड्या नेत्यांची नाचक्की होत आहे, असे वाटल्यामुळेच या सर्व गोष्टी घडत आहेत. एकीकडे केंद्र सरकारने कोविडच्या दुसऱ्या लाटेस तोंड देण्याची कोणतीही पूर्वतयारी केली नाही. उलट ही साथ संपली आहे आणि आम्ही त्यावर विजय मिळवला आहे, असा जयघोष करण्यात आला. भाजपच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करणारा ठरावही संमत करण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळण्यातच धन्यता मानली. त्याचवेळी दुसरीकडे टूलकिटसारख्या प्रकरणात पक्षाध्यक्षांनीदेखील स्वतःला गुंतवून घेतले. त्यामुळे पक्षाच्या अडचणीत भरच पडली आहे.
पात्रा यांनी कॉंग्रेसच्या संशोधन विभागाचे बनावट लेटरहेड वापरून खोट्या गोष्टी पसरवल्या आहेत, असा आरोप पक्षाने दिल्ली पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. आता दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहखात्याच्याच कक्षेत येतात. त्यामुळे या तक्रारीवर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही. गेल्या डिसेंबरमध्ये भाजपच्या समाजमाध्यमांचे प्रमुख अमित मालवीय यांनी शेतकरी आंदोलनावर एक ट्विट केले होते. त्यावरही ट्विटरने आक्षेप घेतला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये जगप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने भारतातील शेतकरी आंदोलनास समर्थ मिळवण्यासाठी एक टूलकिट प्रसृत केले होते. ते शेअर केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी बेंगळुरू येथील दिशा रवी या तरुणीस अटक केली होती. अटकेनंतर दहा दिवसांनी दिशाला जामीन मिळाला.
वास्तविक ग्रेटा ही सोळा वर्षांची स्वीडिश मुलगी आहे. पर्यावरणहानी, लोप पावत असलेल्या शेकडो पशुपक्ष्यांच्या जाती यासंबंधी ती आवाज उठवत असते. विविध देशप्रमुखांना टोचणी लावत असते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास कोणकोणत्या विविध पद्धतींनी समर्थन देता येईल व आंदोलनाचे बळ कसे वाढवता येईल, याविषयी तिने काही मार्ग सुचवले. दिशाचा गुगल डॉक आणि ग्रेटाशी संबंध आला, हा तिचा गुन्हा ठरवण्यात येऊन तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी तिच्यावर शासनाविरुद्ध कटकारस्थान केल्याचा आरोप करून तिला देशद्रोही ठरवले. सध्या देशात सुरू असलेल्या किसान आंदोलनाबद्दल जगाला सजग करण्याचा प्रयत्न करणे, हा गुन्हा ठरवून मला तुरुंगात सडवत ठेवले जाणार असेल, तर ती शिक्षा मी आनंदाने भोगायला तयार आहे, असे दिशाने न्यायालयाला सांगितले. अशाच प्रकारे अनेक पत्रकारांना शेतकरी आंदोलनाचे वृत्तांकन केल्याबद्दल गुन्हेगार ठरवण्यात आले होते. हजारो लोकांच्या ट्विटर खात्यांवर बंदी आणून, त्यांची खाती ब्लॉक करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर “करोनाविषयक चुकीच्या बातम्या’ देणाऱ्या पत्रकारांना आणि समाजमाध्यमांवर पोस्ट लिहिणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. वास्तविक कॉंग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्याने आपल्या टूलकिटमधून कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टी केलेल्या नाहीत. कॉंग्रेसवर टीका करण्याचा भाजपला जरूर अधिकार आहे; परंतु दीर्घकाळ या देशावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेसला कोणत्याही ठोस पुराव्याविना देशद्रोही ठरवणे, हे हास्यास्पद व संतापजनक आहे. नव्यानेच तारुण्यात प्रवेश करणाऱ्यांनी मस्ती की पाठशाला म्हणत, ऊठसूट समोरच्याला ढुशी द्यावी, तसा प्रकार पात्रा यांच्याबाबत होत आहे. भाजपच्या या “पात्रां’ना कोणीतरी आवरायला पाहिजे.