मनात विरक्तीची, वैराग्याची भावना उत्पन्न झालेला संसारी माणूस “अंगाला भस्म फासून हिमालयात निघून जावंसं वाटतंय,’ असं म्हणतो. अर्थात, लगेच तो जात नाही; कारण त्याला मुळात विरक्ती आलेलीच नसते. संसारातल्या अडथळ्यांच्या शर्यतीचा आलेला तो उबग असतो. मनाची झालेली चिडचीड असते आणि ती क्षणिक असते; परंतु असलं काहीतरी म्हणण्याची प्रथा पडल्यामुळे ज्याला काहीच जमत नाही त्यानं साधू व्हावं, अशी चुकीची मानसिकता सार्वत्रिक झाली.
वास्तविक, साधू होणं कधीच सोपं नव्हतं. आज तर बिलकूल नाही. ज्याकाळी सुखसुविधा आजच्या तुलनेत एक दशांशसुद्धा नव्हत्या, अशा काळात त्याही सुविधांचा त्याग करणं खूपच अवघड होतं. आजही “हिमालयात निघून जातो,’ म्हणणारे कधीही तिथल्या तापमानाचा विचार करत नाहीत. कारण त्यांच्या घरातलं वातावरण तापलेलं असतं. एरवी आज असंख्य सुखसुविधांची सवय जडलेला माणूस साधू बनण्याचा विचारसुद्धा करणार नाही.
दुसरी अडचण अशी की, संशयानं व्यापलेल्या, सोशल मीडियावरच्या थापांनी बरबटलेल्या आजच्या काळात साधू बनणं म्हणजे थेट यमराजांची आराधना सुरू करणं! “मुलं पळवणारी टोळी’ ही एकच थाप शेकडो वेळा यशस्वी होण्याचा विक्रम याच देशात प्रस्थापित होऊ शकतो. लोक आपल्या मुलांविषयी इतके संवेदनशील असतात, याला कदाचित अन्य पुरावा मिळू शकणार नाही; पण “मुलं पळवणारे’ आले की झालेच सगळे दक्ष!
झुंडीनं यायचं आणि एखाद्याला मरेपर्यंत बदडायचं ही “मर्दानगी’ हल्ली वारंवार बघायला मिळतेय; परंतु किमान आपण “चोर सोडून संन्याशाला फाशी’ देत आहोत का, याचं तरी भान असणं अपेक्षित आहे. मुलं पळवणाऱ्या टोळीची अफवा सर्वाधिक यशस्वी ठरल्यामुळे तीच पुनःपुन्हा वापरून कुणी आपल्या समाजावर “प्रयोग’ करतंय की काय, असाही संशय येणं स्वाभाविक आहे. सांगली जिल्ह्यात नुकताच घडलेला प्रकार हा राज्यातला अशा प्रकारचा दुसरा घृणास्पद प्रसंग. (कोणत्या सरकारनं किती वेळात किती जणांना अटक केली, या चर्चेत गुंतून पडणाऱ्यांची मुलं पळवणारी टोळी आली आहे. सबब राजकारण इष्टॉप!)
उत्तर प्रदेशात मंदिरात बसलेल्या साधूंना गैरसमजुतीतून मरेपर्यंत मारल्याच्या दोन-तीन घटना नजीकच्या काळात घडल्यात. आपल्याकडे मुलं पळवणारी टोळी असल्याचा संशय घेऊन कित्येक लोकांना जिवानिशी मारण्यात आलंय. गावोगावी फिरते व्यापारी आणि छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांना फिरण्याची चोरी झाली झाली. एक अफवा उठते आणि लोक थेट कायदा हातात घेतात, अशा घटना तर जंगलातही घडत नाहीत. सांगलीत साधूंनी मुलांना काहीतरी विचारलं, मदत मागितली आणि लोकांचा संशय बळावला, असं सांगितलं जातंय. याचाच अर्थ, संशय आल्यास काय करायचं, याचेच क्लासेस घेतले पाहिजेत.
राजधानी दिल्लीत काही वर्षांपूर्वी नर वानर किंवा वनमानव आल्याची अफवा उठली होती. लोक सैरावैरा पळत सुटले होते. त्यातूनच चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेला जीव गमवावा लागला. उद्या खरंच एखादी आफत ओढवली, तर काय परिस्थिती होईल या लोकांची? अफवा पसरवणारा दोषी आहेच; पण अफवेला बळी पडणारा अतिमूर्ख किंवा अतिचतुर मानायला हवा. कारण, एकतर तो खरंच घाबरतो किंवा वेड पांघरून “मर्दानगी’ दाखवण्यासाठी थेट कायदाच हातात घेतो.