मुंबई आणि वऱ्हाडखेरीज संयुक्त महाराष्ट्र अशक्यच : डॉ. पंजाबराव देशमुख ह्यांचे मत
अहमदनगर, ता. 31 : मुंबई शहर व वऱ्हाड हे महाराष्ट्राच्या अंतर्गत प्रदेश असून त्यांच्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र होऊच शकत नाही; आणि असा “संयुक्त’ महाराष्ट्र कोणताही महाराष्ट्रीय स्वीकारणार नाहीं, असे उद्गार भारताचे शेतकीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख ह्यांनीं कोपरगांव येथे भाषण करताना काढलें.
मद्रास आणि मुंबई
ते म्हणाले, “”इतर कोणत्याही भाषिक जनतेपेक्षा मुंबई शहरांत मराठी भाषिक जनता अधिक असतांना देखील मुंबई शहर संयुक्त महाराष्ट्रांत न घालणें हास्यास्पद आणि अन्याय आहें. मुंबई शहरांतील गुजराथी भाषिकांपेक्षाही मद्रास शहरांत तेलगू भाषिक अधिक असतांना देखील मद्रास शहर तामिळनाडूमध्येच ठेवण्यात आलें; मग मुंबई स्वतंत्र ठेवण्याची भाषा का बोलावी? गुजराथी वृत्तपत्रांतून गरीब महाराष्ट्रीय जनतेबद्दल जी टीका येते ती खोडसाळ व दुष्ट आहें. या टीकेमुळे घाबरण्याचेही काही कारण नाही.”
भारतातील बेकारीच्या प्रश्नांकडे नजिकच्या काळाच्या दृष्टीनें पाहू नका
प्रा. धनंजयराव गाडगीळ यांचे विवेचन
नवी दिल्ली, ता. 31 : भांडवल गुंतविण्याची अधिकाधिक साधनें उपलब्ध करून देणें हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनें फार महत्त्वाचा प्रश्न असून तसें झाल्यास सध्याचा बेकारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सुटू शकेल, असें मत सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रा. धनंजयराव गाडगीळ यांनी येथे भाषण करतांना व्यक्त केले.
आपली अर्थव्यवस्था निराळी
ते आपल्या भाषणांत म्हणाले, “”या प्रश्नाकडे पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणें नजिकच्या काळाच्या दृष्टीनें बघण्याचें धोरण भारताने स्वीकारू नये, कारण भारतीय अर्थव्यवस्था वेगळ्या प्रकारची आहें. पाश्चात्य राष्ट्रांत मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवले आहे तर येथे भांडवल संचय कसा करावा हाच मोठा प्रश्न आहें. म्हणून केवळ नजीकच्या काळाच्या दृष्टीने विचार करून भागणार नाहीं. येथे क्रयशक्ती वाढविली की उपभोगाचे प्रमाणही वाढते. युद्धकाळात भारतीय शेतकऱ्यांची मिळकत वाढली पण त्याचबरोबर ते उपभोग्य मालाचा खपही अधिक करू लागले.”