-हेमंत देसाई
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुराचे संकट निर्माण झाले असून, करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस फुगत चालली आहे. तरी या प्रश्नांऐवजी, कॉंग्रेस व भाजपमध्ये सुशांतवरून लढाई सुरू आहे. प्रसारमाध्यमांनी तर गिधाडाप्रमाणे रिया चक्रवर्तीवर हल्लाबोल सुरू केला.
दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयच्या विशेष पथकाने त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सलग तीन दिवस चौकशी केली. ही चौकशी सुरू होण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांनी रियाला गुन्हेगार ठरवून टाकले. सीबीआयने चौकशी केल्यावर रिया मुंबई पोलिसांकडे गेली. ती तेथे का गेली, असा सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तर सुशांत सिंह प्रकरणाशी जोडला गेलेला निर्माता संदीप सिंह व भाजप यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचा कॉंग्रेसने आरोप केला आहे. अमली पदार्थांशी संदीपचे नाव जोडले गेले असून, त्याने भाजप कार्यालयात 53 वेळा टेलिफोन केल्याची माहिती उघड झाली आहे. याच संदीपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चरित्रपट बनवला होता, हे विशेष. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस व भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
एका खासगी चॅनेलने भाजपची सुपारी घेतल्याप्रमाणे मीडिया ट्रायल सुरू केली आहे. त्यांनी व अन्य काही चॅनेल्सनी रियानेच गुन्हा केला असल्याचे चित्र निर्माण केले आहे. एका प्रसिद्ध मासिकाच्या सल्लागार संपादकांनी रियाची मुलाखत घेताच, या चॅनेलने त्यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करायला सुरुवात केली. सुशांतच्या प्रकरणावरून पोळी भाजून, आपला टीआरपी वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न या इंग्रजी आणि हिंदी चॅनेलने केला आहे. त्यांचा टीआरपी वाढला असून, या प्रतिकुलतेस तोंड देण्यासाठी काही चॅनेलनेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. यासाठी त्यांनी रियाची एक्सक्लुझिव्ह मुलाखत मिळवली आणि तिला टीआरपीही चांगला आला व यामुळेच या चॅनेलचे पित्त खवळले. वास्तविक रियाची बाजू काय आहे, हे जाणून घेण्यात तत्त्वतः काहीही चूक नाही. प्रेक्षकांना विषयाच्या वेगवेगळ्या बाजू माहीत करून देणे, हे माध्यमांचे कर्तव्यच आहे. परंतु या चॅनेलला हे मान्य नसून, ते एकांगी पत्रकारिता करत आहेत.
सुशांतसाठी दोन ऍम्ब्युलन्स का बोलावण्यात आल्या? स्ट्रेचर पाच फूट अकरा इंच होते. सुशांतची उंची पाच फूट दहा इंच होती. मग इतके लहान स्ट्रेचर का आणले? यावर बातम्या चालवण्यात आल्या. त्यानंतर महेश भट व रियाचे फोटो दाखवून, त्यांच्यात काहीतरी संबंध असल्याचे सूचित करण्यात आले. ईडी आणि सीबीआयने चौकशी सुरू केल्यानंतर, रियाने सुशांतच्या खात्यातील पैशावर डल्ला मारला, अशा बातम्या देण्यात आल्या. त्यानंतर रिया आणि आणखी काही लोक यांच्यातील व्हॉट्सऍप मेसेजवरून, रियाचा ड्रग माफियाशी संबंध होता, असा आरोप करण्यात आला. सुशांत सिंग राजपूतने “नेव्हर सीन बिफोर पिक्चर्स ऍक्ससेस्ड’ अशा कॅप्शनखाली सुशांतच्या मृतदेहाचे फोटोही एका चॅनेलने दाखवले. टेलिव्हिजन पत्रकारिता इतक्या खालच्या पातळीला कधीच गेली नव्हती. चॅनेलवाल्यांनी आणि समाजमाध्यमांनी रियाला अगोदरच खुनी ठरवून टाकलेले आहे. तिनेच सुशांतला आपल्या जाळ्यात ओढले, ड्रग्ज दिले आणि त्याची संपत्ती लुटली, असे दावे केले जात आहेत.
तिच्या घराच्या बाहेर चॅनेलवाले ठाण मांडून उभे असतात आणि रिया घराबाहेर पडली की, ती जिथे कुठे जाईल, तिथे तिचा पाठलाग केला जातो. तिच्या कुटुंबीयांनाही वार्ताहर सतावत आहेत. तिच्यासाठी डबा घेऊन जाणाऱ्या पोराच्या मागेही मीडियावाले लागले होते. या सर्व तपासातून उद्या रिया वा अन्य कोणी दोषी ठरले, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु तुरुंगवासाची शिक्षा चालेल, पण ही नको अशीच रियाची भावना झाली असणार. तपासयंत्रणा आपल्या लाडक्या चॅनेल्सना सर्व माहिती पुरवत आहेत. त्यातही रिया व अन्य व्यक्ती यांच्यातील खासगी व्हॉट्सऍप मेसेजेस हे याप्रकारे लीक करणे, हे त्याच्या खासगीपणावरचे आक्रमणच आहे. या मेसेजेसचा उपयोग खुन्याचा तपास लावण्यासाठी अवश्य करता येईल. पण मीडियाला त्याची माहिती देण्याचे कारण काय? तसेच सुशांतवर मानसिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याबद्दलची माहिती माध्यमांना देणे, हे अनैतिकच आहे. रियाची मुलाखत न मिळालेल्या चॅनेलवाल्यांनी अन्य चॅनेल्सची निंदानालस्ती करणे, हेही धक्कादायक आहे. रियाला तर बलात्काराच्या व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सुशांतचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सच्या चालकालाही समाज माध्यमांवरून गलिच्छ शब्दातील टीका ऐकून घ्यावी लागत आहे.
गेल्यावर्षी ऑगस्टा वेस्टलॅंडचे प्रकरण पुन्हा चर्चेस आले होते, त्यावेळी या प्रकरणातील एका आरोपीस भारतात आणण्यात आले. तेव्हा त्याच्या उलटतपासणीची माहितीही पोलिसांतर्फे माध्यमांना दिली जात होती. त्याबद्दल न्यायालयानेच केंद्र सरकारची खरडपट्टी काढली होती. नवी दिल्लीत आरुषी तलवारचा खून झाला, सुरुवातीलाच त्याबद्दल तिचे आईवडीलच दोषी असल्याचे ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जाहीर करून टाकले होते. हे प्रकरणही माध्यमांनी अत्यंत वाईट पद्धतीने सादर केले होते. पोलिसांनी तर घटनास्थळीही पत्रकारांना जाण्यास मज्जाव केला नव्हता. प्रसारमाध्यमांनी तर रिया चक्रवर्तीचा आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाशी, एवढेच नव्हे, तर दाऊदशी संबंध आहे इथपर्यंत बातम्या चालवल्या. रिया काळी जादू करते, असेही सांगण्यात आले. सुशांत राजपूतचा मृत्यू होऊन अडीच महिने झाले. इतके दिवस रोजच्या रोज इतर बातम्यांना बगल देऊन, हीच एकमेव राष्ट्रीय घटना व आपत्ती असल्याचे चित्र रंगवण्यात येत होते. टीव्ही पत्रकारिता खरोखरच रसातळाला गेली आहे, असेच म्हणावेसे वाटते.