-माधव विद्वांस
खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले के. एन. सिंह यांचा आज जन्मदिन.त्यांचे पूर्ण नाव कृष्ण निरंजन सिंह. त्यांचा जन्म डेहराडून येथे 1 सप्टेंबर 1908 रोजी झाला. त्यांचे वडील चंदी प्रसाद सिंह हे राजघराण्यातील होते तसेच वकीलही होते. त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे वकील व्हावे अशी इच्छा होती.
त्यांनी आपले लक्ष भालाफेक या खेळाकडे वळविले.
वर्ष 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड केली होती. परंतु त्यांची बहीण आजारी पडली व तिला कोलकाता येथे उपचारासाठी ठेवावे लागले. त्यामुळे त्यांना तिच्याबरोबर राहावे लागले.त्याचवेळी त्यांची गाठ पृथ्वीराज कपूर यांच्याशी पडली. कपूर हे सिंह कुटुंबाचे स्नेही होते. त्यांनी त्यांची ओळख दिग्दर्शक देबकी बोस यांच्याबरोबर करून दिली. देवकी बोस यांनी “सुन्हेरा संसार’ या चित्रपटामध्ये त्यांना काम करण्याची संधी दिली आणि त्यांचे चित्रपट दुनियेत पदार्पण झाले. त्यानंतर वर्ष 1936 मध्ये “करोडपती’, वर्ष 1937 मध्ये “विद्यापती’ असे चित्रपट त्यांनी केले. वर्ष 1938 मधील बागबान या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली. बागबान या चित्रपटाने सुवर्णमहोत्सव साजरा केला.
मध्यमपट्टीतील आवाजात, तोंडात चिरूट (पाइप) धरून डोळे मिचकावण्याची खास शैली त्यांच्यातील खुनशी, कावेबाजपणा पडद्यावर उठून दिसायचा. याबाबत त्यांनी एक आठवण सांगितली आहे, त्यांना त्यांच्या एका मित्राने चित्रीकरणानंतर जाताना एक लिफाफा वाटेत देण्यास सांगितले होते. तेथे गेल्यावर दारावरची बेल त्यांनी वाजविली. घरातील बाईने दार उघडले. त्या बाईने त्यांच्याकडे पहिले व भीतीने किंचाळली.त्यांच्या अभिनयाची ही एकप्रकारची पावतीच होती.
अभिनेता म्हणून भूमिकेसाठी ते समरस होत. त्यासाठी मिळालेली व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते अभ्यास करीत असत. उदाहरणार्थ, त्यांनी “इंस्पेक्टर’ चित्रपटामध्ये टांगेवाल्याचे काम केले होते. त्यासाठी एका टांगेवाल्याकडे घोड्याला लगाम कसा लावायचा व टांगा कसा हाकायचा याचाही सराव केला होता. त्यांनी खलनायक म्हणून तसेच चरित्रअभिनेता,डॉक्टर, गुप्तहेर, वकील, पोलीस इन्स्पेक्टर अशाही भूमिका केल्या.
वर्ष 1940 ते 1970च्या दशकात, सिकंदर (1941), ज्वार भाटा (दिलीपकुमार यांचा पहिला चित्रपट वर्ष 1944), हुमायूँ (1945), आवारा (1951), जाल (1952), सीआयडी (1956), हावडा ब्रिज (1958), चलती का नाम गाडी (1958), आम्रपाली (1966) आदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. ही यादी खूप मोठी होईल. त्यांनी सुमारे 200 चित्रपटांमध्ये आपली भूमिका वठविली. वर्ष 1996 मधील “दानवीर’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यांच्या 1936 ते 1996 या 60 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी त्या काळातील दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले.
सिंह दाम्पत्याला स्वतःचे मूल न झाल्याने त्यांनी आपला भाऊ बिक्रम यांचा मुलगा पुष्करला दत्तकपुत्र म्हणून स्वीकारले. पुष्कर हे दूरचित्रवाणी मालिकेचे निर्माते आहेत. वृद्धापकाळात ते दृष्टिहीन झाले होते. 1 जानेवारी 2000 रोजी वयाच्या 91व्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले.