फराक्का प्रश्नावर बोलणी करण्यास भारत सदैव तयार
लंडन, दि. 19 – फराक्का प्रश्नांवर बोलणी करण्यासाठी भारत सदैव तयार आहे, असे केंद्रीय कृषी व पाटबंधारे मंत्री जगजीवनराम यांनी सांगितले. बांगलादेश या प्रश्नास आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहे. निम्मे-निम्मे पाणी वाटून घेण्याची भारताची इच्छा आहे. मात्र भारतीय राज्यांवर अधिक परिणाम होईल, अशा सूचना आम्ही स्वीकारणार नाही, असेही जगजीवनराम म्हणाले.
आमच्या मार्गात कोणी येऊ नये!
लंडन – समर्थ राष्ट्र बनण्याच्या मार्गात भारताला रोखू शकणारी शक्ती या भूतलावर नाही, असा विश्वास जगजीवनराम यांनी व्यक्त केला. कोणालाही आपल्या क्षेत्रात प्रतिस्पर्धी नको असतो, असे ते म्हणाले.
कुटुंब नियोजन कार्यामध्ये राजकारण आणू नका
पुणे – कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम म्हणजे गरिबी दूर करण्याचा प्रभावी मार्ग असून त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केले. युवकांनी कुटुंब नियोजन कार्यक्रम हाती घेऊन गरिबी दूर करण्याचा महत्त्वाचा पायंडा घातलेला आहे. कुटुंबनियोजन ही या देशाची आचारसंहिता व्हावी. धर्माच्या-जातीच्या नावावर द्रारिद्य्र दूर करण्याच्या योजनेला खीळ घालणारे राष्ट्राचा घात करतील.
माओच्या शवाचे काय केले?
पेकिंग – या पूर्वीच्या चिनी नेत्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांची रक्षा दर्शनासाठी ठेवण्यात येई; माओंच्या शवावर अंत्यविधी कोठे झाला व देहाचे काय करण्यात आले हे गूढच आहे.