उर्दू साहित्यातील सर्वात प्रसिद्ध प्रेमकवी शायर मीर महंमद तकी यांचा आज स्मृतिदिन. मीर तकी यांचा जन्म वर्ष 1723 मध्ये आग्रा येथे झाला. त्यांचे आजोबा हेजाझ (सौदी अरेबिया) येथून हैदराबाद येथे आले.त्यानंतर आग्रा येथे आले. वडील मीर मुत्ताकी यांचा मीर तकी यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे प्रेमाचे महत्त्व आणि करुणेचे मूल्य आयुष्यभर मीर यांचेबरोबर राहिले आणि त्यांच्या कवितेमध्ये रुजले. त्यांचे “जिक्र-ए-मीर’ हे आत्मचरित्र आहे. त्यामध्ये त्यांच्या बालपणापासून ते लखनौमध्ये राहण्यास जाण्यापर्यंतचा काळ समाविष्ट आहे.
उर्दू ही भारतात जन्मलेली भाषा आहे. फारसी, अरबी तसेच हिंदी या भाषेच्या प्रभावातून या नवीन भाषेचा वापर अकबरापासून सुरू झाला. तेव्हापासून तीन-चार शतकांच्या कालखंडात मीर सारख्या अनेक शायरांनी उर्दू भाषा अधिक समृद्ध केली. मिर्झा गालिब हे मीरचे समकालीन होते, गालिबने स्वत: त्याच्या काही दोह्यांमधून मीर खरोखरच एक प्रतिभाशाली होता, असे नमूद केले आहे. मीर यांच्या सहज सौंदर्याच्या जाणिवेने त्याला देशी अभिव्यक्ती आणि पर्शियन प्रतिमा आणि मुहावरे यातून येणारी नवीन शब्दसंपदा निर्माण झाली. ज्यामुळे रेख्ता नावाची हिंदीजन्य नवीन अभिजात भाषा तयार झाली. हीच भाषा भावी कवींच्या पिढ्यांना मार्गदर्शन करणारी ठरली. मीरचे काव्यलेखन स्वतःच्या सुरुवातीच्या प्रेमप्रकरणातून प्रेरित आहे.
त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या सावत्रभावांनी सर्व मालमत्तेचा ताबा घेतला. मात्र अनाथ झाल्यानंतर त्यांच्या काकांनी त्यांची काळजी घेतली. कालांतराने वयाच्या 17व्या वर्षी ते दिल्लीत आले. त्यावेळी त्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. बादशहाच्या दरबारात एक रुपया मानधन निश्चित करण्यात आले. त्याच वेळी दिल्लीवर अफगाणिस्तानमधून लूट करण्यासाठी आक्रमणे होऊ लागली. वर्ष 1739 मध्ये पर्शियाच्या नादिरशहाने केलेल्या आक्रमणादरम्यान, त्यांचे मानधन बंद झाले. तेव्हा झालेली लूट व खून पाहून ते व्यथित झाले. या गोष्टीही त्यांच्या काव्यामधून व्यक्त झाल्या आहेत.
त्याकाळी राजदरबारात फारसी काव्याला अधिक महत्त्व दिले जात असे. अमरोहा येथील सय्यद सआदत अली यांनी मीर तकी यांना उर्दूमध्ये शेर म्हणण्यास प्रोत्साहन दिले. पुढे त्यांना माळव्याच्या सुभेदाराच्या मुलाचे मुसाहिब (गुणवंत व्यक्ती) बनवण्यात आले. 1761 मध्ये भारतावर पुन्हा एकदा हल्ला झाला. यावेळी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. दिल्लीला पुन्हा विनाशाचे दिवस पाहावे लागले. मात्र यावेळीही त्यांनी उद्ध्वस्त झालेली दिल्ली पाहून ते व्यथित झाले. त्यानंतर ते लखनौ येथे आसफ-उद-दुलाहच्या दरबारात दाखल झाले. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य लखनौमध्येच व्यतित केले.
मीर तकी यांच्या अनुभवातील पुढील काव्यपंक्ती त्यांच्या व्यथा दाखवितात. “दिल वो नगर नहीं कि फिर आबाद हो सके पछताओंगे सुनो हो ये बस्ती उजाकर। देख तो दिल कि जॉं से उठता है ये धुआँ सा कहॉं से उठता है।। अर्थात, हृदय हे शहर नाही जे पुन्हा निर्माण होऊ शकेल. ही वस्ती उद्ध्वस्त करून तुम्हाला पश्चात्ताप होईल। पहा माझे हृदय, माझ्या हृदयातून उठतो हा धूर कुठून येता।। मुलगी, मुलगा आणि पत्नी यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांची तब्येत बिघडली आणि 20 सप्टेंबर 1810 रोजी त्यांचा मृत्यू झाला.