-सुशीलकुमार
भारत सरकारच्या नैसर्गिक गॅस मंत्रालय आणि पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. याच अनुषंगाने येता सप्ताह हा इंधन बचत जनजागृतीपर सप्ताह म्हणून घोषित केला गेला आहे.
समाजहिताची कोणतीही गोष्ट जेव्हा एका विशिष्ट सद्हेतूने जनमानसापर्यंत पोहचवायची असते तेव्हा अनेक माध्यमांतून त्या विशिष्ट बाबीचा लोकजागर होणं गरजेचं असतं. अशा प्रकारच्या विविध माध्यमांतूनच कोणत्याही चांगल्या उद्दिष्टाची परिपूर्तता प्रत्यक्षात होताना दिसते. पेट्रोल, डीझेल, सीएनजी वायू या सारखी वाहनासाठी उपयोगी इंधन असोत किंवा अगदी आपल्या दैनंदिन वापरातील रॉकेल किंवा स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मिथेन गॅस असो ही इंधन म्हणजे निसर्गाने मानवाला जगण्यासाठी दिलेल वरदानच आहेत. परंतु वर्षानुवर्षे या इंधनाचा अगदी वारेमाप आणि बेफिकिरीने वापर होत असल्याने आता काळानुसार हा नैसर्गिक इंधनाचा साठा आटत असलेला दिसतोय. पेट्रोल, डीझेल, मिथेन गॅस आपल्या उद्याच्या पिढ्यांसाठी जपून ठेवणे आणि भविष्यातील मानवी विकासासाठी याच इंधनाचा अगदी काटकसरीने वापर करतानाच सौरऊर्जा असेल किंवा इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर करून इंधन बचत करणं ही आता काळाची गरज बनली आहे.
इंधनाचे नैसर्गिक स्रोत मानवाला गरजेतून उपलब्ध झाले खरे अर्थात शेकडो वर्षांपूर्वी या इंधनाचे साठे हे निसर्गतः विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच मग माणसाने या इंधनांचा अतिरेकी वापर सुरू केला. तो इतका की आता हेच नैसर्गिक इंधनाचे स्रोत संपत चाललेले आहेत. आपण जर या नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने नाही केला तर आपला भविष्याचा प्रवास हा प्रगतीच्या नव्हे तर अधोगतीच्या मार्गाला लागेल अशी चिंता आता जगभरातील शास्त्रज्ञच व्यक्त करू लागलेले आहेत. म्हणूनच बदलत्या काळाची गरज म्हणून आपण सर्वांनीच सर्व स्तरावर इंधन बचत करणे हे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.
इंधन वाचवायचे म्हणजे काय बर करायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर अगदी छोट्या छोट्या उपायातून आपण प्रत्येक जण इंधनाची बचत करून इंधन वाचवू शकतो. आपल्याकडे अमाप पैसे आहे म्हणून श्रीमंतीची शेखी मिरविण्यासाठी खासगी वाहनातून आपण प्रवास करतो परंतु त्यामुळे एका व्यक्तीसाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात पेट्रोलची नासाडी होते. अनेकजण तर केवळ मौजमजेसाठी अशा प्रकारे खासगी वाहनांचा वापर करणे म्हणजे इंधनाची उधळपट्टीच म्हणावी लागेल. म्हणूनच कार्यालयीन कामकाजासाठी असो किंवा वैयक्तिक कामकाजासाठी नेहमी बेस्ट किंवा रेल्वे, लोकल सारख्या सार्वजनिक वाहनांचा वापर केला किंवा सामूहिक तत्त्वावर प्रवासासाठी खासगी बसेसचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल. रिक्षा किंवा टॅक्सी सारख्या वाहनांचा अगदीच आवश्यकता असेल त्यानुसार वापर करणं हिताचं ठरेल. आपण राहतो त्या ठिकाणापासून कमीतकमी 5 किलोमीटर अंतरासाठी आपल्या पारंपरिक सायकल या वाहनाचा वापर केला तर इंधन वाचेलच शिवाय शारीरिक कसरत झाल्याने आरोग्यासाठी ते फायद्याचेच ठरेल. रस्त्यावर गाडी चालवताना वाहनाचा वेग विशिष्ट मर्यादेत ठेवणे, सिग्नल असेल तिथे शक्यतो गाडी बंद करणे, अशा छोट्या गोष्टीतून इंधनाची मोठी बचत होऊ शकते. इंधनाचे नैसर्गिक स्रोत संपत चालले असल्यामुळेच आता इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या सार्वजनिक बसेसचा वापर वाढतोय शिवाय इलक्ट्रिक स्कुटी आणि कार देखील आलेल्या आहेत ही देखील इंधन बचतीची उत्तम संकल्पनाच म्हणावी लागेल.
घरगुती स्तरावर इंधन बचतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अगदी सध्या सोप्या गोष्टीतून आपल्या सिलेंडरमधील मिथेन वायूची बचत करू शकतो. आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी जर गॅस पेटवण्यापूर्वी सर्व प्राथमिक तयारी करून ठेवली तर वेळेची बचत होते आणि गॅस देखील वाचतो. अनेकदा गॅसवर एखादा पदार्थ शिजायला ठेवला जातो आणि टीव्हीवरील मालिकेत किंवा इतर कामात व्यस्त होऊन आपण कितीतरी गॅस वाया घालवतो. तसे न करता गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवून पदार्थ शिजताना कायम देखरेख केली तरी गॅस वाचू शकतो. मुळात दाळ, तांदूळ, बटाटे अशा प्रकारचे पदार्थ शिजविण्यासाठी कुकरचा वापर केला आणि काही पदार्थ गरम करण्यासाठी ओव्हनचा वापर केल्याने देखील खूप मोठी गॅस बचत होऊ शकते.
अनेक घरांमध्ये केवळ पाणी गरम करण्यासाठी तासन्तास गॅस वाया घालवला जातो. त्याऐवजी गिझरचा वापर करणे कधीही चांगले. नैसर्गिक वायूंची उपलब्धता आणि मर्यादा लक्षात घेऊन आपल्या शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेचा इंधन म्हणून किती उपयोग होऊ शकतो याचे संशोधन सत्यात उतरवून दाखविले आहे. सौरपेटी हे असेच नैसर्गिक मोफत मिळणारे इंधन आहे. या सौर पेट्यांचा घराघरात वापर केला गेला तर पाणी उकळणे, पदार्थ शिजविणे, उकडणे अशी काम केवळ सौरऊर्जेचा वापर करून करता येतील. थोडा वेळ अधिक लागेल परंतु इंधनाची बचत आणि मोफत नैसर्गिक इंधनाची सोय होईल.
पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने देखील देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सक्षम अर्थात संरक्षण महत्त्व महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. याच माध्यमातून उद्याच्या भावी पिढीकडून अर्थात शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी इंधन बचतीवर आधारित चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. इंधन बचतीचा हा जनजागृतीपर कार्यक्रम म्हणजे उद्याच्या भविष्यातील इंधन तरतुदीचा एक उपक्रमच आहे. काळाची पावलं ओळखून आज केलेली इंधनाची बचत ही मानवाला अधोगती ऐवजी अधिकाधिक प्रगतीकडे नेणार हे नक्की.