गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर, 2020 रोजी मुंबईची बत्ती गुल झाली. मुंबईच्या उपनगरांमधील वीज पुरवठाही दिवसभर ठप्प होता. तांत्रिक बिघाडामुळे बऱ्याचदा असे होत असते. त्यामुळे लोकांनी तसे गृहीत धरले. इतरांनीही ते सत्य मानले. मात्र त्याचवेळी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी घातपाताची शक्यता वर्तवली होती. आपल्याकडे मोठी दुर्घटना झाली की “इस मे विदेशी ताकदों का हाथ है,’ असे म्हणण्याची प्रथा आहे. प्रत्येक वेळी आपण पाकिस्तानचे नाव घेत नाही. काही घटनांच्या संदर्भात यात तथ्य असते.
बऱ्याचदा हा वेळ मारून नेण्याचाही प्रकार असतो. नंतर या वाक्याची यथेच्छ टिंगल उडवण्यात आली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विधानाची थट्टा झाली नाही. मात्र वीज जाण्यात घातपात कसा असू शकतो, असा प्रश्न तेव्हाही बऱ्याच जणांना पडला होता. त्यांनी तो बोलून दाखवला नाही. पण आज साडेचार महिन्यांनी अमेरिकेच्या एका दैनिकाने यावर फोकस केल्यावर भारतात किंबहुना महाराष्ट्रात “प्रकाश’ पडला आहे. अमेरिकेच्याच एका ज्येष्ठ सिनेटरने बायडेन प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. फ्रॅंक पॅलोन हे त्यांचे नाव. हा प्रकार चीनने केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच भविष्यात चीन पुन्हा असे करू शकते असा इशारा त्यांनी दिला.
अमेरिकेने भारताच्या पाठीशी उभे राहायला हवे अशी सूचनाही त्यांनी मांडली. भारताच्या पॉवर ग्रीडच्या सिस्टीमवर सायबर हल्ला झाला. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. घातपाताचा संशय व्यक्त केला. अमेरिकेच्या माध्यमातील बातम्या त्याला पुष्टी देत आहेत. तेथील कॉंग्रेसचे सदस्य आपल्या अध्यक्षांचे याकडे लक्ष वेधत आहेत. मात्र दुर्दैव असे की भारतात अजून हा विषय गांभीर्यानेच चर्चिला गेलेला नाही. भाजपाच्या एका मंत्र्यांनी तर ही शक्यता फेटाळून लावली. चीन गलवानमध्ये घुसखोरी करेल, डोकलाममध्ये आगळीक करेल, अरूणाचल प्रदेशमध्ये घुसून एखादे गाव वसवेल एवढीच आपल्या दृष्टीने चीनच्या हल्ल्यांची व्याप्ती आहे. ते सायबर हल्ला करतील असे कदाचित गृहीत धरलेही असावे. मात्र हा हल्ला पीएमओ, संरक्षण मंत्रालय, अगदीच गेला बाजार गृहमंत्रालयांच्या साइटसपुरता मर्यादित असेल असे मानले गेले असावे. मात्र येथे झालेला प्रकार गंभीर आहे. त्यांनी एका शहराला ठप्प केले. तेही दिवसा. तेही भारताच्या आर्थिक राजधानीला.
वीज गेल्यावर धावणारी मुंबई कशी थांबते हे त्या दिवशी समजले. शेअर बाजार, लोकल, कार्यालये सगळेच थांबले. हे चीनचेच कारस्थान असल्याचे राज्य सरकारने केलेल्या तपासातही स्पष्ट झाले आहे. भारत सरकारने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ती दिली तर पुन्हा सामान्य होत चाललेले संबंध वेगळ्या वळणावर जाण्याची कदाचित भीती असावी. गुंतवणूक वगैरेचेही मुद्दे असावेत. मात्र एक गोष्ट यापुढे ध्यानात घ्यावी लागेल व ती म्हणजे येथून पुढच्या काळात शत्रू काही सीमेवर असणार नाही. प्रत्येक वेळी बंकर उभारून अथवा गोळीबार करून त्याचा सामना करावा लागणार नाही. तर तो त्याच्या देशात, त्याच्या घरात, त्याच्या जागेवर बसूनही हल्ला करू शकतो. यंत्रणा ठप्प करू शकतो. अर्थात, यात थेट देशाचा सहभाग असेल किंवा नसेलही.
पाकिस्तानच्या भाषेत सांगायचे झाले तर नॉन स्टेट प्लेअर्सचेही हे कारस्थान असू शकेल. म्हणजे हे शत्रू एखाद्या देशाच्या भूमीवरून दुसऱ्या देशाला, तेथील यंत्रणेला वेठीस धरू शकतील. त्यांना भाषणे देऊन भडकवावे लागणार नाही. सीमेवर जाऊन हल्ला करावा लागणार नाही. मुंबईतील घटनेकडे पाहताना आगामी धोक्याचा सखोल विचार करावा लागेल. सायबर हल्ले तसे नवीन नाहीत. ते अनेक देशांत होतात आणि होत आहेत. चीन-अमेरिका, चीन-भारत, पाकिस्तान-भारत, रशिया-अमेरिका अशा अनेक बातम्या आलेल्या आणि वाचल्या गेल्या आहेत. मात्र त्या हल्ल्यांची व्याप्ती मर्यादित होती. जसे प्रत्यक्ष युद्धात नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जाऊ नये असा अलिखित नियम असतो. तसेच सायबर हल्ल्यांचेही आतापर्यंत होते. संरक्षण आणि गृहमंत्रालय त्यांच्या रडारवर असायचे. कोणते शहर अथवा तेथील सामान्य नागरिक त्यात प्रथमच आले आहेत.
प्रत्यक्ष लढ्यात भौगोलिक अथवा अन्य कारणामुळे आपली ताकद कमी पडल्यावर देश अन्य पर्यायांचा वापर करतात. छुपे युद्ध सुरू करतात. पाकिस्तानने दहशतवादाला आश्रय देत स्वत: त्याचा आश्रय घेतला. चीन अगदी तसेच करणार नाही. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून दहशत निर्माण करू शकतो याची शक्यताही नाकारता येत नाही. मुंबईतील बत्ती गुलची घटना त्याकडेच निर्देश करणारी आहे. विदेशी वृत्त संस्थेने दोन दिवसांपूर्वीच एक बातमी दिली होती. त्यात चीनने करोनाविरोधी लस बनवणाऱ्या कंपन्यांच्या सिस्टिमध्ये घुसखोरी केल्याचा दावा केला होता. ब्रिटनच्या “एमआय6′ या गुप्तचर संस्थेसोबत काम करणाऱ्या व्यक्तीच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला होता. या चिनी हॅकर्सने भारतात करोना लस तयार करत असणाऱ्या दोन कंपन्यांनाही लक्ष्य केल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.
मुंबईचा हल्ला किंवा विदेशी संस्थेने केलेला खुलासा हेच दर्शवतोय की चीन गलवान आणि डोकलाममध्ये अपयशी ठरला असेल तर तो गप्प बसेल असे नाही. त्या देशाच्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. त्यांना अमेरिकेला शह द्यायचा आहे. ते करण्यासाठी अगोदर आशियातील आपला मार्ग निष्कंटक करण्यास त्यांना प्राधान्य द्यावे लागेल. त्याकरता तो आपल्या सगळ्यांत निकटच्या प्रतिस्पर्ध्याला म्हणजे भारताला वेगवेगळ्या मार्गाने इशारे देऊ शकतो. बाहेरच्या सर्व्हरमधून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये डाटा ट्रान्सफर झाला असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ते झाले असेल असे जर गृहीत धरले तर त्याचे परिणाम काय होते हे आपल्याला 12 ऑक्टोबरला दिसून आले. एकाच वेळी अन्य काही शहरांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्याकरता त्यांना सीमा ओलांडायची गरज नाही. सायबर हल्ला हे सगळ्यांत घातक वेपन सगळ्यांकडे उपलब्ध झाले आहे. अशा वेळी “इसमे विदेशी ताकदों का हाथ है’ असे जर निदर्शनास येत असेल तर तो यापुढे हसण्यावारी नेण्याचा प्रकार निश्चितच नसणार आहे.
राज्यांतील किंवा केंद्रातील विरोधी पक्षांनी व त्यांच्या सुविद्य नेत्यांनीही हे कायम स्मरणात ठेवावे. काही बाबी जर सरकारच्या निदर्शनास आल्या असतील तर त्यावर खिल्लीचा सुर धरता कामा नये. भविष्यातल्या नव्हे, तर वर्तमानातल्या या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे लागेल. हातात काठी घेऊन चौकात उभा पोलीस आणि बंदुक घेऊन सीमेवर उभा असलेला जवान आपले सुरक्षा कवच आहे. मात्र घराघरात आणि कार्यालयांमध्येही सुरक्षा कवच निर्माण करावे लागणार आहे.