भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध पाहता येणाऱ्या काळात या दोन देशांदरम्यान अनेक आघाड्यांवर संघर्ष पाहायला मिळणार आहे.
सुरक्षा हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने उच्चारला जाऊ शकतो. अन्नसुरक्षा, अर्थसुरक्षा, अशा अनेक सुरक्षांपासून ते राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत सुरक्षा या शब्दाचे अनेक आयाम आहेत. कोणत्याही राष्ट्रात, कोणत्याही विचारसरणीचे सरकार जरी आले, तरी सुरक्षेला त्याची प्राथमिकता असते. भारत हे असे राष्ट्र आहे जे राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कायमच संवेदनशील राहिले आहे. उत्तरेला असलेल्या चीनबरोबर एक तर पश्चिमेला असलेल्या पाकिस्तानबरोबर चार युद्धे भारताने आजवर लढली आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि सीमेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन तर दररोजचेच आहे अशा परिस्थितीत भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण भारताची युद्धसज्जता आणि भविष्यातील आव्हाने यांवर चर्चा करणार आहोत.
आयएनएस विक्रांत या भारताच्या दुसऱ्या पण पहिल्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेचा लोकार्पण सोहळा नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. विक्रांतच्या निर्मिती बरोबर भारत हा जगातील अशा तुरळक देशांमध्ये सहभागी झाला आहे ज्याच्याकडे विमानवाहू युद्धनौका बनविण्याची क्षमता आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी निश्चितच ही अभिमानाची बाब आहे.
आयएनएस विक्रांतच्या निर्मितीपासून ते त्याच्या लोकार्पणापर्यंत प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती देणारे अनेक कार्यक्रम व चर्चासत्रे गेल्या आठवड्यापासून जवळपास सर्वच वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या राष्ट्राचा गौरव करणे आणि आपल्या राष्ट्रात स्वदेशी निर्मित एखाद्या महत्त्वाच्या युद्धनौकेवर चर्चा करणे ही निश्चितच आनंदाची बाब असते; परंतु हे करीत असताना भारत युद्धाच्या इतर आघाड्यांवर खरंच इतका प्रगत झाला आहे का, यावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे.
आधुनिक युद्धाचे नवे आयाम
जसा काळ बदलतो तसे युद्धाचे तंत्र आणि युद्धाचे आयामसुद्धा बदलत असतात. आता पूर्वीप्रमाणे दोन राष्ट्रांचे सैनिक एकमेकांच्या समोर येऊन लढण्याचे दिवस गेले आहेत. आपल्या सैन्याचे कमीत कमी नुकसान करून शत्रूच्या सैन्याचे जास्तीत जास्त नुकसान कसे करता येईल याकडे विविध राष्ट्रांचा कल असतो. अशा प्रकारचे युद्ध करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते त्यालाच संरक्षण क्षेत्रात “हायब्रिड वॉरफेअर’ असे म्हटले जाते. हायब्रिड वॉरफेअरच्या अनेक शाखा आज उपलब्ध आहेत. अमेरिका, रशिया, चीनसारखी राष्ट्रे या तंत्रावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करताना दिसून येतात. हायब्रिड वॉरफेअरमध्ये प्रामुख्याने सायबर वॉर, डिप्लोमसी (कुटनीती), छुपेयुद्ध, व्यापार किंवा आर्थिक युद्ध, दबाव तंत्र, अफवा, फेक न्यूज, इन्फॉरमेटिक वॉरफेअर, सायकोलॉजीकल वार यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पारंपरिक युद्धक्षेत्रात भारत निश्चितच एक महाशक्ती आहे; परंतु पारंपरिक युद्धावर लक्ष देताना भारताने वरील सर्व बाबींवर लक्ष देणेसुद्धा आवश्यक आहे.
ताजे उदाहरण
नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट सामन्यात (4 सप्टेंबर) अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या असिफ अलीचा झेल सोडल्यावर ट्विटर आणि सोशल मीडियावर अर्शदीप नावाने “खलिस्तान’ हा ट्रेंड चालविला गेला होता. भारतीय तपास यंत्रणांनी जेव्हा सदर घटनेचा सखोल तपास केला तेव्हा लक्षात आले की, हा ट्रेंड पाकिस्तानमधून चालविला जात होता. म्हणजेच खोटी माहिती पसरवून भारतीय समाजात फूट पाडून भारताची एकजूट नष्ट करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडून सुरू आहे. पाकिस्तानने केलेल्या या प्रकाराला “इन्फॉरमेटिक वॉरफेअर’ म्हटले जाते आणि हा “हायब्रिड वॉरफेअर’चाच एक प्रकार आहे.
अशाच प्रकारची घटना काही वर्षांपूर्वी मुंबईत घडली होती. जेव्हा संपूर्ण मुंबईची वीज 15 मिनिटांसाठी घालविण्यात आली होती. तपासाअंती चिनी हॅकर्सनी हा प्रकार घडवून आणल्याचे निदर्शनास आणले होते. तमिळनाडूमध्ये भारत आणि रशियाचा एकत्रित उपक्रम असलेल्या आण्विक ऊर्जानिर्मिती केंद्रातील सर्व संगणक इस्रायलच्या हॅकर्सनी बंद पाडल्याची घटना 2019 मध्ये घडली होती. वरील सर्व प्रकार छोटे वाटत असले, तरी ते अत्यंत गंभीर आहेत. एखाद्या राष्ट्राच्या महत्त्वाच्या संस्थांना हजारो किलोमीटर दूर बसून लक्ष्य करणे आणि त्या राष्ट्राची सुरक्षा खिळखिळी करणे हे आजच्या काळातील युद्धाचे नवे तंत्र आहे. दुर्दैवाने भारत या तंत्राच्या बाबतीत अनेक आघाड्यांवर मागे आहे. भारत हे आशिया खंडातील एक महत्त्वाचे राष्ट्र आहे. दुसरीकडे भारताच्या सीमेला लागून असलेला चीन जागतिक राजकारणात सर्वोच्च स्थान मिळवू पाहात आहे. भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध पाहता येणाऱ्या काळात भारत आणि चीन संघर्ष अनेक आघाड्यांवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी भारताने पारंपरिक युद्धतंत्राबरोबरच आधुनिक युद्धनीतीचे तंत्रसुद्धा आत्मसात करणे आवश्यक आहे.
हायब्रिड वॉरफेअरची सुरुवात
हायब्रिडवर वॉरफेअर या युद्धतंत्राची सुरुवात नक्की कधी झाली हे सांगणे कठीण असले, तरी आधुनिक काळात फ्रॅंक जी हॉफमन यांना “हायब्रिड वॉरफेअर’चा जनक मानले जाते. 2007 मध्ये “कॉनफ्लिक्ट इन ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी : द राइज ऑफ हायब्रिड वॉर’ या शोधनिबंधात त्यांनी याबाबत सखोल भाष्य केले आहे.
फ्रॅंक हॉफमन यांच्या मते, हायब्रिड वॉरफेअरमध्ये अफवा, खोटी माहिती, फेक न्यूजही अशा प्रकारे पसरविली जाते की, काही काळानंतर जनतेला याच अफवा खऱ्या वाटू लागतात. हायब्रिड वॉरफेअरमुळे लोकांचे वर्तन प्रभावित केले जाऊ शकते. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात हे अत्यंत सहज, सोपे, कमी खर्चिक व प्रभावी शस्त्र समजले जाते.
महत्त्वपूर्ण जागतिक उदाहरणे
1) लेबनान : 2006 मध्ये हायब्रिड वॉरफेअर या युद्धतंत्राचा वापर लेबनानने इस्रायल विरोधात केल्याचे दिसून आले. यात हेजबोल्ला या दहशतवादी संघटनेने इस्रायल लष्कराविरोधात गनिमीकाव्याबरोबरच हायब्रिड वॉरफेअरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता.
2) रशिया : 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर कब्जा करतेवेळी युक्रेन विरोधात हायब्रिड वॉरफेअर युद्धतंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. यात रशियाने राजकीय दबावाबरोबरच, खोटी माहिती पुरविणे, अफवा, सायबर हल्ला आणि युक्रेनच्या जनतेला अंतर्गत उठावासाठी प्रवृत्त करणे असे प्रकार केले होते.
सध्या हाती आलेल्या माहितीनुसार अमेरिका, रशिया, चीन, तुर्की (पूर्वीचे नाव टर्की) आणि इस्रायल ही राष्ट्रे हायब्रिड वॉरफेअर युद्ध तंत्रातील अग्रेसर राष्ट्रे समजली जातात. जसा काळ बदलतो तसे तंत्रज्ञानसुद्धा बदलते त्यामुळे नव्या काळात जर टिकून राहायचे असेल तर नवे तंत्र आत्मसात करणे आवश्यक आहे.