सीमा प्रश्न लवकर सोडवावा
बेळगाव, दि. 14 – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हातात असून त्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणून, गेली 20 वर्षे भिजत पडलेला हा प्रश्न लवकर सोडवावा, असा विनंती ठराव महाराष्ट्र एकीकरण समितीने संमत केला.
कोयना भागात भूस्तराला अनेक किमीचा तडा
नवी दिल्ली – कोयना भागात भूस्तराला अनेक किमी लांबीचा तडा गेलेला असून त्यामुळेच 1967 साली तेथे मोठा भूकंप झाला, असे आता आढळून आले आहे. रासायनिक स्फोटकांच्या साहाय्याने या भागात भूकंपविषयक चिकित्सा केल्यानंतर त्यात हे आढळले. कोयना जलाशयाच्या दाबामुळे भूकंप झाला असावा असा अंदाज होता पण आता खरे कारण सापडले.
खिलजीच्या काळातील नाणी सापडली
फत्तेपूर – येथून 56 किमी अंतरावरील शेरपूर गावी काल एका प्राथमिक शाळेच्या इमारतीचा पाया खणण्याचे काम चालू असताना 26 किलोग्रॅम वजनाची चांदीची व तांब्याची नाणी सापडली. ही नाणी अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अण्णा द्रमुक हा राष्ट्रीय पक्ष आहे- एम. जी. रामचंद्रन
मद्रास – अण्णा द्रमुक हा राष्ट्रीय पक्ष आहे. तो केवळ प्रादेशिक पक्ष असल्याचा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून त्याचे नावही बदलून अ.भा.अण्णा द्रमुक असे ठेवण्यात आले आहे, अशी घोषणा आज या पक्षाचे सरचिटणीस एम. जी. रामचंद्रन यांनी येथे केली.