एकदा घर प्रपंच्याच्या त्रासाने गांजलेला, त्रासलेला, घरातील व्यक्तीच्या परस्परातील विसंवादाने दुःखीकष्टी झालेला असा एक माणूस संत कबीर यांच्याकडे त्यांच्या मार्गदर्शनाकरता आला. त्याने आपली समस्या, त्याची करणेही सांगितली आणि उपाय विचारला.
तेव्हा ते म्हणाले, “”बस्सं! इतनीसीही बात है ना? ठीक है!” आणि ते शांत बसून राहिले. एकदम काहीसे आठवून संत कबीर यांनी घरातील एका व्यक्तीस सांगितले, “”बेटा, घरात जा आणि एक कंदील आणून लावून दे.”
झाले! मुलाने घरातून लावलेला कंदील आणला आणि तो दोघांच्यामध्ये ठेवला. ती व्यक्ती मात्र विचारात पडली. पण तरीही गप्पच राहिली.
थोड्या वेळाने घरात डोकावत कबीरदास म्हटले, “”जरा दोन ग्लास दूध आणून दे; पण चटकन”. झाले त्या बरोबर दोन दुधाचे पेले आणून ते दोघांच्या समोर ठेवले. संत कबीर यांनी आपला पेला हाती घेतला आणि दुसरा पेला त्या व्यक्तीस देत म्हणाले, “”लो भाई पहिले दूध पिओ.”
कबीर यांनी आपला पेला रिकामा केला आणि खांद्यावरच्या घमश्याला तोंड पुसले. त्या व्यक्तीने दुधाचा ग्लास तोंडाला लावला पण त्याला तो गोड लागला नाही. कारण दुधात साखर नव्हती. नंतर त्या व्यक्तीने कबीरांना आठवण करून देत विचारले, महाराज माझ्या समस्येवरचा उपाय? तेव्हा ते म्हणाले, “”अरे भाई, मैने तो जबाब दे दिया, तुम कुछ समझे नही क्या?” त्याने मान हलवली.
तेव्हा समजावणीच्या स्वरात कबीरदास म्हणाले, “”अरे बाबा! मी भर दुपारी कंदील लावून मागितला. त्यावेळी खरं तर घरातील माणसं मला वेडा ठरवू शकले असते, तसेच घाईगडबडीत दुधात चुकून त्यांच्या हातून साखरेऐवजी मीठ पडले. मीही त्यांना रागावून ओरडून बोलू शकत होतो. पण आम्ही दोघांनीही तसं काहीही केलं नाही. कारण त्यांना माहीत होते की मी भरदिवसा कंदील लावून मागितला. त्यात काही तरी अर्थ असणार.
तसंच मी पण विचार केला की त्यांनी काही मुद्दाम मीठ घातलं नसणार. संसारात परस्परांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. परस्परांचा एकमेकांवर विश्वास हवा. संवाद हवा वाद नको. कारण घरातली शांती ही त्या घरातल्या लोकांच्या विश्वासावर आणि समजूतदार पणावरच टिकत असते. ते उत्तर ऐकले आणि त्या व्यक्तीच्या डोक्यात त्या बोध कंदिलाचा चक्क प्रकाश पडला.