मुंबई – करोनाच्या काळात भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली होती. अजूनही काही कर्मचारी घरातून काम करीत आहेत. मात्र आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे या कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करा असे सांगत आहेत.
भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबर पासून कार्यालयातून काम करण्याच्या सूचना जारी केल्या असल्याचे वृत्त आहे. कंपनीच्या जवळ जवळ 95% कर्मचाऱ्यांचे अंशतः व 70 टक्के कर्मचाऱ्यांचे पूर्णतः लसीकरण झाले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन काम केल्यानंतर त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता कमी आहे. ही बाब ध्यानात घेऊन आता कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम सुरू करण्यास सांगितले आहे.
सध्या टीसीएस कंपनीचे 20 ते 25 टक्के कर्मचारी कार्यालयातून काम करतात. तर उरलेले कर्मचारी घरातून काम करतात. कंपनीमध्ये 6 लाख कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारावर कसलाही परिणाम झालेला नसल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे. इतर कंपन्यांच्या उलाढालीत आणि नफ्यात मोठ्या प्रमाणात घट होत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम झाला असल्याचे समजले जाते.
भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टीसीएसने सर्व कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबरपासून कार्यालयातून काम करण्याची सूचना केल्यामुळे भारतातील इतर छोट्या- मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्याची सूचना करण्याची शक्यता आहे. (Work From Home: Work from home in IT companies will end)