तसं म्हटलं तर आज प्रत्येक माणूस हा ज्ञानी आहेच. प्रत्येकालाच कशाचे ना कशाचे तरी उत्तम ज्ञान आहेच. प्रत्येकाच्या अंगात कोणते ना कोणते तरी कलाकौशल्य आहेच. एकूणच काय तर आपण सारेजण आज सुशिक्षित आहोत. ज्ञानाची अनेक दालने आज आपणच आपल्यासाठी उघडी करून घेतली आहेत.
विज्ञानाच्या क्षेत्रातली माणसाची झेप म्हणजे एक गरूडभरारी म्हणावी लागेल. तंत्रज्ञानच्या क्षेत्रात तर त्याने परग्रहांवरही पाऊल ठेवीत आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. वैद्यकीय शास्त्र, शल्य चिकित्सा, औषधोपचार याच्या जोरावर माणसाने जरी मृत्यूवर मात केलेली नसली तरी त्याने तो काही काळासाठी का होईना; पण निश्चितपणे लांबविला आहे. एकूणच काय, तर ज्ञानाच्या बाबतीत आपण चार पावले अधिकच पुढे आहोत. आपण ज्ञानाच्या, विज्ञानाच्या साधन-सुविधांच्या उपलब्धतेमुळे आपले जीवन सुखकर केले आहे. इच्छा करताच अनेक गोष्टी आपल्या समोर हजर होतात. मग आपण हे एवढं सार ज्ञानाच्या बळावर केले असतानाही काही खऱ्या मानवी हितचिंतकांचा हा आग्रह मात्र का, की तुम्ही फक्त ज्ञानी नव्हे तर आत्मज्ञानी व्हा.
आज जगात ज्ञानी सगळेच आहेत, पण आत्मज्ञानी मात्र फार कमी आहेत. आपल्याला आपली सामाजिक, व्यावहारिक ओळख असते. पण स्वत:ची एक माणूस म्हणून ओळख नसते. आपलं माणसा माणसांमधले माणुसकीचे नाते दुरावत चाललेले आहे. ज्ञानाने आपल्याला अहंकारी, गर्विष्ठ, आत्मकेंद्रित, स्वार्थी आणि मतलबी बनविले आहे. आपण आज दुसऱ्याचा कमी आणि स्वत:चा जास्त विचार करतो आहोत.
आपल्याला आपण जन्माला का आलोय याचे भान राहिलेले नाही. मी कोण, कोठून आलोय आणि मला परत कुठे जायचे आहे, माझ्या या प्राप्त जन्माचे खरे सार्थक कशात आहे, माझा माणूस म्हणून धर्म काय? माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता काय? या कशाचाच आज कोणालाच विचार करावा असे वाटत नाही. खरं तर आपण तिथंच मोठी चूक करतो आहोत.
आपण जग ओळखायला, पाहायला आणि शोधायला निघालो आहोत. पण आपण आपलाच शोध कधी घेणार? आपला जन्म, आपलं जगणं, आपलं अस्तित्व हे कोणाच्या हातात आहे याचा विचार केव्हा आणि कधी करणार? माणसाला माणसाची खरी ओळख हेच त्याच्या आत्मज्ञानी होण्याची निशाणी आहे, हे आपल्याला कधी कळणार?