लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच बिहारमध्ये राजकारण पुन्हा कलाटणी घेण्याची शक्यता आहे. त्यात अर्थातच कोणाचा तरी काटा काढला जाण्याची किंवा कुणालातरी गाफील ठेवत आपला कार्यभाग साधण्याच्या प्रयत्नांची शक्यता दिसते आहे. हे वर्ष या राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडण्याचे संकेत देत आहे.
नितीश कुमार यांच्याबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पक्षात आणि बिहारच्या सत्ताधारी आघाडीत विसंवाद निर्माण झाल्याचे सूचित होत आहे. नितीश यांनी बऱ्याच वेळा पलटी मारली आहे. दोन टोकाच्या विचारधारांसोबत काम केले आहे. पण स्वत:चे मुख्यमंत्रिपद मात्र शाबूत ठेवले. सुरुवातीला याला तात्त्विक वगैरे मुलामा दिला जायचा. राजकीय जाणकारांकडून तसे केले जायचे. तथापि, पलटी मारणे ही नितीश यांची खासियतच आहे. एकेकाचा स्वभाव असतो, नितीश यांचा स्वभाव असा आहे. त्यांचे “पलटूराम’ असे नावही बिहारच्या राजकारणात प्रचलित झाले आहे. “सुशासन बाबू ते पलटूराम’ हा त्यांचा प्रवास त्यांना मारकच आहे. ही प्रतिमा त्यांना आणि त्यांच्या समर्थकांनाही क्लेशदायक आहे.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून नितीश यांचे नेतृत्व पुढे आले. त्या काळात लालूप्रसाद यादव हेही त्यांच्या समवेत होते. 80 च्या अखेरीस आणि 90 च्या सुरुवातीला जनता दलाचा विशेष दबदबा देशाच्या राजकारणात होता. जॉर्ज फर्नांडिस, व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर आदी नावे लोकप्रिय झाली होती. दिल्लीत काही कडबोळ्या सरकारांचे प्रयोग झाले. त्याला बोफोर्सचा मुलामा दिला गेला. नंतर ती सरकारे अंतर्विरोधामुळेच पडली. पंतप्रधान पद गेल्यावर व्ही. पी. सिंग एकप्रकारे राजकीय पटलावरून बादच झाले. लालू, चंद्रशेखर, जॉर्ज यांचा दबदबा कायम राहिला. त्या काळात इतरही काही नावे समोर आली अन् मागेही पडली. जनता दलाची शकले पडण्याचा क्रमही सुरू राहिला. प्रत्येकाने आपापला वेगळा मार्ग पत्करला. नितीश हे जॉर्ज फर्नांडिस यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीसोबत गेले. नंतर पंतप्रधान झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांची जॉर्ज यांच्यावर विशेष मर्जी. किंबहुना जॉर्ज आणि भाजपचे जसवंत सिंह हे वाजपेयी सरकारचे संकटमोचक. आघाडीत काही कुरबूर झाली की हे दोन्ही नेते आग विझवण्याचे काम करायचे. त्याकाळात नितीश बॅकसीटवर होते. नंतर त्यांचा मोठे नेते म्हणून उदय झाला.
वाजपेयी सरकारमध्ये नितीश यांनी काम केले. भाजपच्या साथीने त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रिपदही भूषवले. ज्या लालूंची राजवट उलथवली त्यांच्याशीही त्यांनी घरोबा केला. लालूंसोबत कॉंग्रेसचीही सोबत केली. पुन्हा भाजपच्या छावणीत आले आणि पुन्हा लालूंकडे गेले. हा त्यांचा गेल्या 17 ते 20 वर्षांतील राजकीय प्रवास. एक पक्ष आणि एका नेत्याशी निष्ठा पाळणाऱ्यांबद्दल भारतीय मतदाराला आदर असतो. नितीश स्वत:च त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांची प्रतिमा चांगली आहे. सुशासन बाबू हे बिरूद त्यांनी कर्तृत्वाने कमावले आहे. पण धरसोडपणा उदंड झाला आहे. त्यांच्या जमेच्या बाजूंवरही यामुळे पाणी फेरले जाते आहे.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपची साथ सोडली. देशात परिवर्तन करायचे असल्याची हाक त्यांनी दिली. आपण पंतप्रधान पदासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केले. नितीश यांचा राजकारणात वारस नाही. त्यामुळे अनेक स्वयंघोषित वारस त्यांच्या पक्षात निर्माण झाले. एकीकडे राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे नितीश म्हणाले. मात्र, त्याचवेळी त्यांनी त्यांच्या पक्षातीलच संभाव्य वारसांची कोंडी केली. केंद्रीय मंत्री असलेल्या आरसीपी सिंह यांना घरी बसवले. उपेंद्र कुशवाह यांचा संयम संपवला. कुशवाह यांनी आता नव्या पक्षाची घोषणा केली. सगळ्यात जास्त धक्का देण्याचा प्रकार आता तेजस्वी यादव यांच्याबाबत सुरू झाला आहे.
लालू यादवांचे पुत्र तेजस्वी बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. ते तरुण आहेत ही त्यांची जमेची बाजू. लालू सक्रिय राजकारणातून बाद झाले आहेत. नितीश यांचेही वय झाले आहे. लालूंच्या पक्षाला जवळ करताना तेजस्वी यांना गाजर दाखवले गेले. बिहारचा भविष्यातील चेहरा म्हणून त्यांना पुढे करण्याची हमी दिली गेली. त्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचे जाहीर झाले. आता पुन्हा चाके उलटी फिरू लागली आहेत. 2025 चे नंतर बघू, आता 2024 सुरू आहे. नितीशच आता सर्वोच्च नेते आहेत. 2030 मध्येही ते बिहारचे मुख्यमंत्री राहतील, असे आता जनता दलाचे नेते म्हणत आहेत. एकाच वेळी दिल्लीत आणि पाटण्यातही हे सूचित केले गेले. आपला मार्ग निर्बाध झाल्याचे मानणाऱ्या तेजस्वींसमोर अचानक दरी निर्माण झाली आहे. आघाडीत एकसंधता दाखवण्यासाठी कोणी टोकाचे भाष्य करणार नाही. तथापि, कृतीतून ही दरी रूंदावत चालल्याचे स्पष्ट दिसते आहे. कालच्याच शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात ते अधोरेखित झाले. नितीश आणि तेजस्वी एकत्र दिसणे अपेक्षित होते. तेजस्वी तिकडे फिरकलेच नाहीत. नितीश यांनी मेसेज पाठवल्यानंतर तब्बल दीड तासांनी ते प्रकट झाल्याच्या बातम्या आहेत. नितीश पुन्हा पलटी मारण्याच्या तयारीत आहेत, असा संशय तेजस्वींना आला असेल तर ती त्यांची चूक नाही.
नितीश अगदी निवडणुकीच्या तोंडावर मार्ग बदलत नाहीत. त्यांना हवामानाचा अंदाज अचूक असतो. तसा लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांनाही असायचा. लालूंप्रमाणे त्यांच्यासोबतही नितीश यांनी काम केले आहे. ही मंडळी निवडणुकांच्या किमान 8 ते 10 महिने अगोदर हवामानाची चाचपणी करून आपल्या सोंगट्या फिरवतात. नितीश त्यात निष्णात आहेत. 2024 ची लोकसभा जवळ आली आहे. कॉंग्रेससह सर्व विरोधकांना सोबत घेण्याचे सूतोवाच नितीश यांनी केले आहे. मात्र, त्याचवेळी स्वत:च्या पक्षाला लागलेले खिंडार रोखण्याचे प्रयत्न टाळले. त्यांना मुख्यमंत्रिपदावर कायम राहायचे आहे, असे त्यांचेच लोक म्हणतात. तशी विधानेही होऊ लागली आहेत.
हा भाजपला सकारात्मक संकेत आहे का? ते तेजस्वी यांना अचानक धक्का देण्याची तयारी करत आहेत का? तेजस्वींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो निर्माण झाला आहे ते मतदारांनाही आणि बिहारमधील सर्व पक्षांनाही समजले आहे. संशयकल्लोळाचा अंक सुरू झाला आहे.