सुमारे दीड वर्षापूर्वी ख्यातनाम कवी, गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी उजव्या विचारसरणीच्या संघटनेची तुलना तालिबानशी केली होती. देशातील अल्पसंख्याकांना मारहाण करणाऱ्या घटनांचा उल्लेख करून ते म्हणाले होते की, तालिबान होण्यासाठीचाच हा सराव असावा. त्यांच्याप्रमाणेच हेही लोक वागत आहेत. दोघांमध्ये फरक फक्त नावाचा आहे. त्यांच्या मार्गात भारतीय राज्यघटना उभी असून, संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमा ओलांडायला मागेपुढे पाहणार नाहीत.
विशेष म्हणजे, त्याच निवेदनात जावेद यांनी तालिबान्यांनी अफगाणिस्तानात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर जल्लोष व्यक्त करणाऱ्या काही भारतीय कट्टरतावादी मुस्लिमांवरही टीका केली होती. तालिबानवादी मुस्लीम किंवा जहालपंथीय हिंदुत्ववादी संख्येने कमी असले, तरीदेखील स्त्रियांवर विविध बंधने लादणे, आंतरधर्मीय विवाहांना विरोध करणे, या गोष्टी देशात सर्वत्र घडत आहेत. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांमध्ये जे जे उजवे कट्टरतावादी आहेत, त्यांचे वर्तन सारखेच असून, जावेद यांनी या गोष्टीस प्रथमपासूनच विरोध केला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी आपण “भारत माता की जय’, म्हणणार नाही, कारण घटनेने तशी सक्ती केलेली नाही, असे म्हटले होते. तेव्हा जावेद राज्यसभेत निरोपाचे भाषण करताना म्हणाले होते की, “भारतमाता की जय’ म्हणण्याची सक्ती असो वा नसो, तसे म्हणणे हा मी माझा अधिकारच समजतो. तालिबान व हिंदुत्ववादी संघटनांची त्यांनी केलेली तुलना टीकेचा विषय ठरली. परंतु त्यांचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तो ध्यानात न घेता त्यांना झोडणाऱ्या प्रवृत्तींनी आता मात्र जावेद यांना डोक्यावर घेतले आहे.
भारतीय उपखंडात लोकप्रिय असलेले “फैज अहमद फैज’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लाहोरमध्ये दरवर्षी फैज उत्सव साजरा केला जातो. यंदा जावेद अख्तर या उत्सवात सहभागी झाले होते. त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या झालेल्या कार्यक्रमात एका उपस्थिताने “पाकिस्तान हा सकारात्मक मैत्रीपूर्ण भावना बाळगणारा आणि प्रेमळ लोकांचा देश आहे, असा संदेश भारतीयांना द्या’, असे आवाहन जावेद यांना केले. त्याला उत्तर देताना जावेद यांनी पाकिस्तानलाच खडेबोल सुनावले. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडलेले असून, एकमेकांना दोष देऊन ते सुधारणार नाहीत. ते निवळावेत यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले पाहिजेत. नुसरत फतेह अली खान, मेहदी हसन, गुलाम अली यांच्यासारख्या कलाकारांचे भारतात आपुलकीने स्वागत झाले. भारतीयांनी त्यांचे खूप कौतुकही केले.
एकेकाळी पाकिस्तानने दिलीपकुमार यांना “निशान-ए-पाकिस्तान’ हा पुरस्कार दिला होता; परंतु त्यापलीकडे जाऊन, लता मंगेशकर वा अन्य कलावंतांना पाकिस्तानात कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले नाही. जावेद यांनी या गोष्टीची आठवण करून दिली हे बरेच झाले. याचे कारण आशा भोसले, सुमन कल्याणपूर, महंमद रफी, किशोरकुमार, राज कपूर, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, राजेश खन्ना अशांचे लाखो चाहते पाकमध्ये आहेत. भारतीय दूरचित्रवाणी मालिका तेथे लोकप्रिय आहेत; परंतु कोणत्याही भारतीय कलावंतांचे आगतस्वागत करावे, त्यांचा सन्मान करावा, असे पाकिस्तान सरकारला वा तेथील संस्थांनाही वाटले नाही. याउलट भारतात मात्र अगदी अलीकडच्या काळापर्यंत पाकिस्तानी कलावंत येऊन मैफली करत होते आणि हिंदी चित्रपटांमधून भूमिकाही करत होते. शिवसेना वा मनसेने तीव्र विरोध केल्यानंतरच पाकिस्तानी कलाकारांवर येथे बंदी आली.
पाकपुरस्कृत दहशतवाद सुरू असल्यामुळे त्याबद्दल सामान्य भारतीय नागरिकांमध्ये संताप असणे स्वाभाविकच होते; परंतु जावेद अख्तर यांनी मुंबईवरील 26-11च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत, असा थेट हल्लाच चढवला. हल्लेखोर नॉर्वे किंवा इजिप्तमधून आले नव्हते. ते तुमच्या देशातून आले होते. त्यामुळे त्याबद्दल भारतीयांची तक्रार असेल, तर त्याविषयी पाकिस्तानी लोकांनी अपमान वाटून घेता कामा नये, असे जावेद म्हणाले, तेव्हा लाहोरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला. मध्यंतरीच्या काळात शबाना आझमी आणि जावेद यांना “देशद्रोही’ संबोधणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने “घर में घुसके मारा’ असे ट्विट करून जावेद यांची प्रशंसा केली. शबाना आणि जावेद यांना राष्ट्रद्रोही मानणाऱ्या कंगनाचे डोके तपासून घेतले पाहिजे आणि या दोघांना तिच्या सर्टिफिकेटची गरजही नाही.
मुद्दा हा आहे की, जावेद यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या केलेल्या धिक्काराचे स्वागत सर्वसामान्य पाक नागरिकही करत आहेत. समाजमाध्यमांतून जावेद यांना प्रचंड पाठिंबा मिळत असून, त्यात अनेक पाक कलावंतांचाही समावेश आहे. अर्थात काही पाक सेलेब्रिटीज आणि नट्यांनी जावेद यांच्या वक्तव्यावर टीकाही केली आहे. “जावेद पाकिस्तानवर टीका करत असताना समोरचे लोक शांतपणे सगळे ऐकून कसे घेत होते’, असा सवाल पाकिस्तानी अभिनेते शान शहीद यांनी केला आहे. “कोई अपने घर में आकर बेइज्जत करके जा रहा है और उसपे खुशी से शोर मचाए जा रहा है’, असे सबूर अली हा अभिनेता म्हणाला. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळ्यात निघाली असून, दहशतवादाचा भस्मासूर आता त्यांच्यावरही उलटत आहे. पाकिस्तानात लोकशाहीच्या बुरख्याखाली हुकूमशाहीच आहे. तेथील कलावंतही दबावाखाली असल्यामुळे भयमुक्त विचार व्यक्त करू शकत नाहीत. कारण आयएसआय अथवा एखादी अतिरेकी संघटना कधी गेम करेल, याचा नेम नसतो. परंतु तरीदेखील पाकिस्तान सरकार, तेथील लष्कर आणि सर्वसामान्य पाक नागरिक यांच्यात फरक करण्याची गरज आहे.
उभय देशांतील सर्वसामान्य जनतेत सलोखा निर्माण झाला आणि त्यासाठी कलावंतांचा उपयोग झाला, तर ते फायद्याचेच ठरेल. युरोपात एकात्मिक बाजारपेठ निर्माण झाल्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात सिनेमा बघायला जाऊन परत येणे, सायकलनेदेखील सीमा पार करणे, शेजारच्या देशात जाऊन भेटीगाठी घेणे या गोष्टी सहज शक्य होतात. त्यामुळे व्यापारही वाढतो आणि एकमेकांचा फायदा होतो. कट्टरतावाद भारतातही हळूहळू वाढत असून, काही दिवसांपूर्वीच हरियाणात तथाकथित गोरक्षकांनी मुसलमानांची हत्या केल्याची घटना घडली आहे.
अतिरेकी कट्टरवाद राजकारणाच्या मुख्य धारेतही येत असून, त्यामुळे धार्मिक सलोख्यास तडा जात आहे. मुस्लिमांच्या देशभक्तीबाबत शंका घेतली जात आहे. मुस्लिमांच्या भल्यासाठी एखादे धोरण ठरवले, तर त्यास “अनुनय’ असे संबोधले जात आहे. जावेद यांच्यावर आज फुले उधळणाऱ्यांच्या दुहेरी नीतीवरही सवाल उपस्थित केले पाहिजेत. सर्वच धर्मांतील अतिरेक्यांना सामान्यजनांनी बाजूला केले पाहिजे.