सीमाप्रश्नांत हस्तक्षेप करण्यास विलंब नको
नवी दिल्ली, ता. 23 – 1 नोव्हेंबरपासून सीमा सत्याग्रहात 3000 वर स्वयंसेवकांनी भाग घेऊन तुरूंगवास पत्करला आहे. तेव्हा भारत सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करून हा प्रश्न योग्यरीत्या सोडविण्याची वेळ आली आहे, असे लढा कृती समितीचे चिटणीस दाजिबा देसाई व समिती विधानसभा पक्षाचे नेते उद्धवराव पाटील यांनी पत्रक काढले आहे.
समितीच्या या नेत्यांनी काल येथे पत्रकार बैठक घेऊन आपले निवेदन त्यांना प्रसिद्धीसाठी दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, म्हैसूर राज्यातील मराठी भाषिकांची फार कुचंबणा चालू आहे. भाषा आणि सरकारी नोकऱ्या यासंबंधी त्यांना पक्षपाताने वागविण्यात येते. मराठी प्रदेश मुंबई राज्यात सामील करावा म्हणून तेथील मराठी जनतेने आवाज उठविला आहे. या नेत्यांनी पत्रकांत शेवटी म्हटले आहे, भारत हे एक लोकशाही संघराज्य आहे. निरनिराळ्या घटक राज्यांत स्नेहसंबंध राहणे हे लोकशाहीच्या यशाचे दृष्टीने महत्त्वाचे आहे.
हायड्रोजन बॉंबच्या प्रश्नावरच ब्रिटिश निवडणुकीत भर!
लंडन – ब्रिटिश निवडणूक जवळ येते आहे आणि हायड्रोजन बॉंबचा प्रश्नच सर्व पक्षांत प्रामुख्याने चर्चिला जात आहे. नॉर्फोक येथील अमेरिकन हवाई तळाविरोधी जी सत्याग्रहाची चळवळ चालू आहे तिची राजकीय पक्ष दखल घेत आहेत. अणुचाचणी बंद व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय करार व्हावेत अशी मागणीही सर्वत्र चालू आहे.
तेव्हा हायड्रोजन बॉंब हाच निवडणुकीचा प्रमुख प्रश्न होणार असा रंग दिसत आहे. ब्रिटनच्या कॉंझरव्हेटीव्ह सरकारने चाचणी बंदीचा प्रश्न डावलला तर मजूर पक्ष जनमत आपल्याकडे वळवून घेण्यास तयारीत आहे.
कोंकण रेल्वे : तिसऱ्या योजनेत समावेश
नवी दिल्ली – कोंकण रेल्वेचा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत समावेश करावा, अशी शिफारस केंद्रीय रेल्वेमंत्री जगजीवनराम यांनी नियोजन मंडळास केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे, पाहणीचे काम तातडीने सुरू करणाच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.