पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची एकमेव आंतरिक आस मनी धरून कुठल्याही संकटाची तमा न बाळगता विष्णुदासांनी म्हणजे वारकऱ्यांनी पायीच पंढरीची वाट धरली. दिंड्या, पालख्या आणि वारकरी सोबतीला अखंड हरिनामाचा गजर हे वारीचे रूप म्हणजे भूतलावरचा अनुपम्य सोहळाच.
वारीत असणारा प्रत्येक वारकरी आपल्या चिंतनात, चित्तात केवळ पांडुरंगाचे रूपच साठवितो. त्याची आंतरिक ओढ ही विठूमाऊलीचं दर्शन या एकाच बंधाशी बांधलेली असते. टाळ, मृदूंग आणि अखंड नामघोष ही वारीची जीवनवाहिनीच बनलेली असते आणि देहभान विसरून वारकरी नामरसात न्हाऊन निघतात. हेच वारीचे वेगळेपण आणि आध्यात्मिक शक्तीचे असामान्य प्रकटीकरण सर्व काही विसरून पंढरीची वाट चालणारे वारकरी संतांच्या वचनानुसार
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास।
कठीण वज्रसी भेदू ऐसे।।
कुठलाही भेद संदेह मनात न ठेवता हरिनामाची अखंड साधना आणि हरीच्याच चरणांच्या दर्शनाची आंतरिक इच्छा यांनी भारलेले विष्णुदास हेच वारीतील चैतन्य म्हणून-
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भार अमंगळ।।
वारीतील या चैतन्यात विष्णुदासांना प्रापंचिक जीवनाचा त्यातल्या मोहमायेचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. कारण, हा सर्व भार पांडुरंगाच्या चरणी वाहिलेला असतो म्हणून ते खरे भक्त. त्यांचा योगक्षेम स्वतः पांडुरंगच चालवितात. याच एका सूत्राने वारकऱ्यांचा प्रवास सुरू असतो तो शेवटपर्यंत. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात-
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे।
काहीच साकडे पडो नेही।।
शेवटचे निर्वाणही पांडुरंगाच्या चरणीच व्हावे, एवढा उत्कट भाव वारकऱ्यांच्या ठायी असतो म्हणूनच-
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी।
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे।।
याची डोळा याची देही ही अनुभूती अनुभवणे म्हणजे भूतलावरील वैकुंठाचीच अनुभूती. म्हणून याचा अनुभव घेऊ या.