दक्षिणेतील अभिनेत्री गायत्री रघुराम यांना भाजपने पक्षातून सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. गायत्री या तमिळनाडूतील पक्षाच्या पदाधिकारी आहेत. गायत्री यांच्यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
दक्षिणेकडील राज्यात भाजपकडून विस्तार केला जात असताना गायत्री यांच्यावर निलंबनाची कारवाई हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. अभिनेत्री गायत्री रघुराम या भाजपच्या तमिळनाडू डेव्हलपमेंट विंगच्या नेत्या आहेत. पक्षाने त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा बाळगल्या होत्या. पण त्यांच्यामुळे पक्षाची अब्रू चव्हाट्यावर आली. अर्थात गायत्री यांनी आरोप नाकारले आहेत.
गायत्री या दक्षिण चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायिका मानल्या जातात. अर्थात, त्या अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडल्या आहेत. 2001 मध्ये त्यांनी तेलगू चित्रपटात अभिनेत्री म्हणून पर्दापण केले आणि नंतर ब्रेक घेतला. 2008 मध्ये कोरिओग्राफर म्हणून भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत काम सुरू केले. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांचा विवाह देखील वादात राहिला आहे.
गायत्री यांनी 2006 मध्ये अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरबरोबर विवाह केला. मात्र 2008 मध्ये त्यांनी पती आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला. 2010 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2019 मध्ये गायत्री रघुराम या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल झाला. एका पार्टीतून येत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना अडवले असता त्या मद्यधुंद स्थितीत आढळल्या. या प्रकरणाची राज्यात खूप चर्चा झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने स्वत: गाडी चालवत त्यांना घरी सोडले. याप्रकरणी गायत्री यांच्यावर दंडही बसला. मात्र, गायत्री यांनी ही खोटी बातमी असल्याचे सांगितले.
या प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांनी देखील गायत्री यांच्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली. 2020 मध्ये गायत्री यांनी मनुस्मृतीवरून देखील अनेक ट्विट केले. हे ट्विट कंपनीच्या धोरणाच्या विरोधात असल्याचे सांगत ट्विटरने त्यांचे खाते कायमस्वरूपी बंद केले. वयाच्या 14 व्या वर्षी गायत्री यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. 2017 मध्ये गायत्री तमिळी भाषेतील बिग बॉसमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे संचलन कमल हसन करत होते. बिग बॉसमधील त्यांच्या वर्तनावरूनही बरीच टीका झाली आणि 56 व्या दिवशी त्यांची बिग बॉसच्या शोमधून गच्छंती झाली.