“आरोग्याचे संविधान’ या पुस्तकाच्या शीर्षकातून बऱ्याच गोष्टी साध्य होतात. संविधान म्हटल्यावर शिस्त आणि नियम यांची सांगड लक्षात येते आणि ती आरोग्याबाबत किती महत्त्वाची आहे, हे अलीकडच्या जीवनशैलीवरूनच समजते.
“जीवनातील कर्तव्यपूर्तीसाठी निकोप शरीराची आवश्यकता’ आणि त्यासाठी सुयोग्य जीवनशैली हे आता सिद्धच झाले आहे. सुयोग्य आहार, आरोग्य, व्यायाम आणि भोजन ही सुखी जीवनाची चतुःसूत्री आहे आणि त्याच गोष्टींचा ऊहापोह या पुस्तकातून केला आहे. भारतीय जीवनाला सुयोग्य अशा सहा ऋतूंमधून सर्व आहार आणि आरोग्य पद्धतींची परिपूर्ण चिकित्सा या पुस्तकाचा गाभा आहे.
या पुस्तकाबाबत लेखकानेच दिलेले स्पष्टीकरण हे “आरोग्याचे संविधान’ या शब्दाला खरा अर्थ देते. त्यांनी म्हटले आहे की, शरीररचनेत विभिन्न प्रकारच्या अवयवांचा समावेश असला तरी ही शरीररचना सुरळीतपणे सुरू राहावी यासाठी आरोग्यविषयक काही मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे असते. हीच भूमिका “आरोग्य संविधान’ची आहे. योग, आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी अशा सर्व आरोग्य पद्धतींचा विचार या पुस्तकात केलेला आहे. एकूण सात विभागात हे पुस्तक विभागले आहे.
त्यात आपल्या आरोग्याचे महत्त्व, दिन-रात्र-ऋतुचर्या, आहार, अन्नद्रव्याची उपयुक्तता, आहारातील पौष्टिक घटक, पथ्य, याबरोबरच व्यायाम, योग, प्राणायाम, योगासने आणि त्यांच्या पद्धती-लाभ, अध्यात्म, आरोग्य चिकित्सा, साथीचे आजार, प्रथमोपचार, महिलांचे आजार, वैवाहिक जीवन, व्यंधत्व, मातृत्व, वृद्धापकाळातील आजार या सर्वांचा विचार करताना त्यावरील उपचारांबाबतही माहिती या पुस्तकातून मिळते. आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि आयुरारोग्य वाढवण्याच्या मार्गाने यात दिलेल्या चिकित्सा पद्धती या “संविधानात्मक’ आहेत. यातील शेवटचा भाग “संकीर्ण’चा यात अवयवदान आणि आरोग्यदान याबाबत दिलेली माहिती सर्वात महत्त्वाची वाटते.
सध्याचा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो आहे. करोनासारख्या घातक आजारातून बरेच जण सावरले असले तरी अजून या सावटाखालीच अनेकजण आहेत. त्याचे परिणाम अजूनही भोगावे लागत आहेत. या आणि अशा विघातक आजारांतून निकोप आरोग्य मिळवण्यासाठी अशा पुस्तकांची आणि त्यातील शास्त्रशुद्ध चिकित्सांची आपल्याला मार्गदर्शक म्हणून मदत होत आहे. एक दिशा आणि दृष्टी आरोग्याबाबत या पुस्तकातून सर्वार्थांने मिळते. “वनराई’सारख्या पर्यावरणवादी संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले असल्याने या पुस्तकाची सत्यता ही एक जमेची बाजू आहे. या पुस्तकासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आहेत, ही बाब पुस्तकाची विश्वासार्हता वाढवण्यास महत्त्वाची ठरते आहे.
लेखक – डॉ. आनंद मोरे
पृष्ठे- 720, किंमत- 1000 रुपये