संगीतकार, गायक, अभिनेते, संगीत गुरू, उत्कृष्ट शेफ अशा पंचरंगी, बहुभाषी, हसतमुख व्यक्तिमत्त्वाचे शंकर महादेवन यांचा काल वाढदिवस साजरा झाला. मूळचे केरळमधील पल्लकडं येथील असलेल्या अय्यर कुटुंबात त्यांचा जन्म 3 मार्च 1967 रोजी चेंबूर, मुंबई येथे झाला. त्यांच्या घरातील वातावरण संगीतप्रेमी असल्याने त्यांच्यावर लहानपणीच संगीताचे संस्कार झाले. शंकर महादेवन यांना जणू आईच्या गर्भातच संगीताची देणगी मिळाली होती. लहानपणीच त्यांनी हार्मोनियम वादन आत्मसात केले होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी वीणा वाजवण्यास सुरुवात केली.
त्यांनी वर्ष 1988 मध्ये रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. पदवी मिळाल्यावर ओरॅकल कॉर्पोरेशनमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणून रूजू झाले. पण त्यांचे संगीत क्षेत्र त्यांना स्वस्थ बसू देईना. संगीताच्या ओढीने नोकरी सोडली आणि आपल्या आवडत्या क्षेत्राकडे परत आले.
शंकर महादेवन यांनी पं. श्रीनिवास खळे यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे तसेच टी. आर. बालामणी यांच्याकडून कर्नाटक शास्त्रीय संगीतातील धडे घेतले. त्यांना वयाच्या 11 व्या वर्षी लता मंगेशकर यांच्यासोबत “राम श्याम गुण गान’ नावाच्या अल्बमसाठी गाणे गाण्याची संधी मिळाली व त्यांच्या संगीत प्रवासास सुरुवात झाली. वर्ष 1998 मध्ये “डुप्लिकेट’ चित्रपटातील “तुम नहीं जाना’ या गाण्याने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी त्यांचा पहिला अल्बम ब्रेथलेस रिलीज केला व या शंकर महादेवन प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले. त्यांनी छम्मा छम्मा, भुंबरो भुंबरो, घनन घनन, माही वे, कजरा रे, मितवा, सौ आसून आणि इतर बरीच हिट गाणी गायली आहेत. त्यांनी तेलुगु, तामिळी, मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी, मल्याळम भाषेत गाणी गायली. शंकर महादेवन यांनी एहसान नुरानी आणि लॉय मेंडोन्सा या संगीतकारांबरोबर लोकप्रिय संगीत त्रिकूट शंकर-एहसान-लॉयची निर्मिती केली.
वर्ष 1997 मध्ये कॅडबरी डेरीमिल्क चॉकलेटची “क्या स्वाद है जिंदगी में’ त्यांच्या आवाजात पहिल्यांदा जाहिरात केली गेली. शंकर महादेवन यांनी “कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनेता गायक म्हणून काम केले. महादेवन यांनी सरनांग या अल्बममध्ये भूमिपुत्र आणि संगिनी ही दोन गाणी गायली आहेत. त्यांना पाश्चात्य संगीताबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आहे.
पुण्याच्या रमणबाग हायस्कूलच्या संगीताच्या अभ्यासिकेत, कार्यक्रमात महादेवन म्हणाले, भाषेत जसे व्याकरणाचे, तसे संगीतात शास्त्रीय गायनाचे महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाने गाण्याचा पाया भक्कम होतो. त्यावेळी “बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’ हे गीत बारकाव्यांसह गाऊन दाखविले. हे कवी वा. रा. कांत यांनी रचलेले व श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेले गीत त्यांनी पं. वसंतराव देशपांडे यांच्यानंतर वेगळ्या ढंगात अनेक कार्यक्रमामध्ये गायले आहे.
महादेवन यांच्या प्रेमविवाहाची कथाही त्यांच्या गाण्यासारखी गोड आहे. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या संगीता यांच्याबरोबर ते एकत्र बॅडमिंटन खेळायचे. खेळता खेळता समोर बांधलेल्या नेटवर फूल उडवताना प्रेमाच्या जाळ्यात कधी अडकले ते त्यांना कळलेच नाही. अखेर त्याची परिणती विवाहात झाली.