-शर्मिला जगताप
“फ. म. शहाजिंदे यांच्या कवितेतील ‘निधर्मीवाद’ हे पुस्तक एका कवी मनातील वेगवेगळ्या छटा उलगडून दाखविते. लहानपणी मनाला झालेल्या जखमा कवी कवितेच्या माध्यमातून दाखवितो. फ. म. शहाजिंदे हे सेक्युलर कवी आहेत. त्यांच्या काव्यातील निधर्मीवाद शोधून त्याचे मूल्यमापन या पुस्तकात केले आहे. डॉ. जर्नादन भोसले यांनी या पुस्तकात शहाजिंदे यांच्या काव्यातील निधर्मीवाद शोधला आहे.
“निधर्मी’, “आदम’ आणि “ग्वाही’ हे शहाजिंदे यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह. हिंदू-मुस्लीम संस्कृतीच्या संघर्षात त्यांच्या मनाची झालेली कुचंबणा तिचेच पडसाद कोणताच रंग, धर्म, संप्रदाय नसलेल्या त्यांच्या कवितेतून दिसून येतात. त्यांच्या “प्रगती’ या कवितेत आजकाल खेडेगावात प्रगती कशी होते, त्याचा फायदा कोण कसा घेतो आणि त्यातून गाव कसा बदलत जातो याचे सविस्तर वर्णन येते. गावात अनेक योजना येतात. त्याचा लाभ काहींनाच होतो. काही लोक मोठे होतात तर काही लोक मोठे केले जातात. पैशामुळे मोठ्यांच्या घरी दहशत पाणी भरते. शेवटी सर्वत्र दहशत पसरते आणि आपण वेडे लोक या दहशतीलाच कसे प्रगती समजतो हे स्पष्टपणे कवी मांडतो.
जॉर्ज ऑरवेल यांच्या “ऍनिमल फार्म’ या कादंबरीतील ‘Some pigs are more eaual’ हे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या निधर्मी या काव्यसंग्रहात येते. याचा अर्थ आपला देश जरी सेक्युलर असला तरी या देशातील बहुसंख्य लोकांचे वागणे या सेक्युलर वृत्तीशी विसंगत असले तरी आपणाला स्वीकारावे लागते. आपण बोलण्यात सेक्युलर असतो, पण वागण्यात धर्मांध असतो आणि हे सगळे लोकांनी स्वीकारल्यावर जातीयवादी पदवीधर तयार होतात. धर्माधर्मांत सख्ख्य नसले तरी माणसामाणसात सख्ख्य असायला काय हरकत आहे. पण तसे घडत नाही.
नायकाला माणूस म्हणून जगायचे आहे. या प्रामाणिक प्रयत्नाला प्रतिसाद मिळत नाही. दुसऱ्यावर टीका करणे यात मानवता धर्मांचे पालन होत नाही. दुसऱ्याला आधार देण्यात, प्रोत्साहन देण्यात मानवता धर्माचे पालन होते हेच खरे. पण काही माणसे दुसऱ्यांची उणी काढून स्वतःचे अस्तित्व टिकवू पाहतात. परंतु ही अस्तित्वाची कलई असते. कलई ही कायमची टिकत नसते, कालांतराने ती उडून जाते, पण हे टीका करण्यातून सिद्ध होणारे क्षणभंगूर आहे हे काही समाजाला पटत नाही.
शहाजिंदे यांचे विचार उलगडण्यात डॉ. भोसले यशस्वी झाले आहे. पुस्तकात कवितेचे विश्लेषण असले तरी कवी शहाजिंदे यांच्याशी आपली नाळ जोडली जाते. पुस्तकाचा एकूण आशय आपल्या मनात खोलवर घर करतो.