-प्रा. अविनाश कोल्हे
मुस्लीम समाजाच्या दुर्दैवाने या समाजाला सक्षम नेतृत्व न मिळाल्यामुळे “राजकीय सौदेबाजीतील एक प्यादं’ अशी स्थिती झालेली आहे. हे छोटे पक्ष मोठ्या पक्षांशी राजकीय सौदेबाजी करतात आणि यांचे नेते व जवळचे अनुयायी स्वतःच्या तुंबड्या भरतात. यातील सर्वसामान्य गरीब मुस्लीम बांधवांपर्यंत काहीही जात नाही. यातूनच मग भावनेचे राजकारण अपरिहार्य होते आणि हा समाज आक्रमक होतो. या समाजाचे दुर्दैव संपणार तर कधी?
मागच्या महिन्यात अकरा ऑगस्ट रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहराच्या पूर्व भागात अगदी छोट्या प्रमाणात अचानक जातीय दंगल उसळली होती. या दंगलीमागे 21 जून 2009 रोजी दिल्लीत स्थापन झालेला पक्ष “सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एसडीपीआय) आहे अशी सर्रास चर्चा सुरू होती. हा पक्ष “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा राजकीय चेहरा आहे. हा पक्ष तसा छोटा असला तरी देशातील जवळपास सोळा राज्यांत या पक्षाचा थोडाफार प्रभाव आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश वगैरे राज्यांत या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हा पक्ष मुस्लीम, दलित आणि इतर अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी झटणारा पक्ष म्हणून ओळखला जातो.
2009 साली स्थापन झालेल्या पक्षाने पुढच्याच वर्षी म्हणजे 2010 साली निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. 2010 साली केरळ राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांत या पक्षाने चार शहरांतील स्थानिक संस्थांत चौदा जागा जिंकल्या होत्या. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत या पक्षाने सहा राज्यांतून 29 जागा लढवल्या होत्या. या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी हा पक्ष अनेक राज्यांत स्थानिक पातळीवर, खासकरून मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भागात प्रभाव राखून आहे.
बंगळुरू शहराच्या ज्या भागात मागच्या महिन्यात दंगल झाली त्याभागात मुस्लिमांची लोकसंख्या 49 टक्के आहे! हा पक्ष अल्पसंख्याकाचे आक्रमक राजकारण करत असतो व वेळ पडल्यास हिंसात्मक कारवायाही करत असतो, असे पोलिसांचे निरीक्षण आहे. अकरा ऑगस्टचे प्रकरण घडण्याअगोदर एसडीपीआयचे स्थानिक नेते मुझ्झमिल पाशा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित आमदाराच्या नातेवाईकाने मुस्लिमांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य समर्थक होते. बघता बघता वातावरण तंग झाले आणि पोलीस स्टेशनवर दगडफेक सुरू झाली. समर्थकांनी आजूबाजूची काही वाहने पेटवून दिली. पोलिसांनी पाशा आणि सुमारे तीनशे लोकांना अटक केली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात धार्मिक दंग्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
निवडणुका आल्या की दंगली घडवून आणायच्या आणि त्याद्वारे ध्रुवीकरण घडवून आणायचे ही फार जुनी क्लृप्ती आहे. लवकरच बंगळुरू महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून “मुसलमानांचे राजकारण’ हा मुद्दा वादग्रस्त राहिला आहे. 1885 साली मुंबईत स्थापन झालेल्या कॉंग्रेसमध्ये मुसलमानांनी सहभागी होऊ नये असे जाहीर आवाहन सर सय्यद अहमदखान यांनी केले होते. नंतर 30 डिसेंबर 1906 रोजी नवाब ख्वाजा सलिमुल्ला यांनी “ऑल इंडिया मुस्लीम लीग’ हा खास मुसलमानांसाठी पक्ष स्थापन केला. तेव्हापासून “मुस्लिमांचे राजकारण’ या मुद्द्याची स्वतंत्र चर्चा करावी लागत आहे. यथावकाश या पक्षाचे नेतृत्व मोहम्मद अली जिना यांच्याकडे आले. त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून मुसलमानांसाठी स्वतंत्र पाकिस्तान मिळवला.
स्वतंत्र भारतात मुस्लीम लीग पक्ष म्हणून कार्यरत होणे अशक्यच होते. मुहम्मद ईस्माईल यांनी 14 मार्च 1948 रोजी चेन्नई येथे “इंडियन युनियन मुस्लीम लीग’ हा पक्ष स्थापन केला. प्रत्यक्षात मात्र हा पक्ष फक्त केरळ राज्यापुरता सीमित राहिला. हा पक्ष अनेकदा कॉंग्रेसप्रणीत “संयुक्त लोकशाही आघाडी’मध्ये सहभागी झालेला आहे. केरळ राज्यातून या पक्षाचे एक दोन खासदार निवडून येतात. विद्यमान लोकसभेत या पक्षाचे चार खासदार आहेत. या पक्षाचे कार्य केरळ राज्यातच आहे. केरळ राज्याप्रमाणे एकाच राज्यात सीमित असलेले सुमारे दोन डझन पक्षं आहेत जे फक्त मुस्लीम समाजासाठी कार्य करतात.
पाकिस्तान निर्माण झाला याचा अर्थ भारतातील सर्व मुसलमान पाकिस्तानात किंवा पाकिस्तानातले सर्व हिंदू भारतात आले, असं झालं नाही. आजही भारतात सुमारे बारा टक्के म्हणजे जवळजवळ बावीस कोटी मुसलमान आहेत. पण त्यांचे प्रतिनिधित्व करेल असा एकही राष्ट्रीय पक्ष नाही. मात्र भारताच्या अनेक राज्यांत मुसलमानांचे स्थानिक पक्ष आहेत. आज बंगळुरूमधील दंगलीच्या निमित्ताने चर्चेत असलेला एसडीपीआय असाच एक पक्ष!
ही स्थिती आजची नाही तर भारत स्वतंत्र झाल्यापासून आहे. मुस्लीम समाज संघटित होऊन एक मोठी राजकीय शक्ती निर्माण झाली नाही. उलट अनेक राज्यांत, शहरांत स्थानिक पातळीचे राजकारण करण्यात धन्यता मानणारे पक्ष निर्माण झाले. हे छोटे छोटे पक्ष फार मोठा विचार करत नाहीत आणि सतत तडजोडीचे राजकारण करत छोटे छोटे फायदे पदरात पाडून घेतात. याचा दुष्परिणाम म्हणजे मुसलमान मतांचे विभाजन. याचा सरतेशेवटी फायदा भाजपाला होतो असाही आरोप करणारे अभ्यासक कमी नाहीत.
मुस्लिमांच्या अशा छोट्या पक्षांचा वापर मोठे पक्ष सतत करत असतात. आतासुद्धा भाजपातील एक गट जो मुख्यमंत्री येडीयुरप्पांवर नाराज आहे त्याच गटाने यात आग ओतली असंही बोललं जातं तर कॉंग्रेसने भाजपा सरकारकडे बोट दाखवलं होतं.लवकरच बंगळुरू महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. ही दंगल म्हणजे त्याचीच पूर्वतयारी असल्याचे ही आरोप होत आहेत. अशा दंगलीनंतर सर्वसामान्य माणसांचेच नुकसान होते आणि खरे गुन्हेगार कधीही समोर येत नाहीत.