अब आएगा मजा खेल का..! आता मराठी मुलखातल्या तमाम नागरिकांनी पूर्णावस्थेच्या दिशेनं वाटचाल सुरू केलीय. 2019 मध्ये मराठी माणसाने मतदान केलं. आता त्याला पुन्हा एकदा 2024 मध्ये निर्णय घ्यायचाय. अजून दोन वर्षे आहेत म्हणून मराठी माणूस काहीसा गाफील राहिला होता. वास्तविक, निवडणुकीचं वातावरण 2019 पासून आजअखेर नेत्यांनी चिकाटीनं कायम राखलंय; पण ही वातावरणनिर्मिती सवयीची झालीये आणि निर्णय घेण्याची वेळ एवढ्यात येणार नाही, असं वाटत असतानाच मध्यावधी निवडणुकांची भाकितं सुरू झालीत.
वातावरण कसं, कायम धगधगतं राहायला पाहिजे! मुख्य म्हणजे, मतदार नावाच्या प्राण्याला सारखे धक्के बसले पाहिजेत. दुसरी बाब अशी, की काय चुकीचं आणि काय बरोबर, हे ठरवणं अशक्यच होऊन गेलं पाहिजे. राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि नेते ही कामं इमानेइतबारे करीत आहेत याबद्दल मराठी माणसानं कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. “नैसर्गिक युती कशास म्हणावे,’ या विषयावर खुला परिसंवाद सुरू असतानाच कॉंग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये जाणार, ही बातमी आली पाहिजे. नंतर ती खरी की खोटी यावर चर्चा झाली पाहिजे. नंतर राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, असं म्हटलं गेलं पाहिजे. त्याच वेळी “सरकार पडणार,’ असं राष्ट्रवादीनं म्हटलं पाहिजे. कोण कुणाकडे जाणं “नैसर्गिक’, हे कळताच कामा नये.
एकंदरीत “नैसर्गिक’ शब्द पुरता अनैसर्गिक वाटावा, अशी तजवीज सर्वांनी मिळून केलीये. वास्तविक, सुरुवातीपासूनच काहीही “नैसर्गिक’ नव्हतं. कुणी “स्वाभिमान कायम राखण्यासाठी’ केलं, तर कुणी “राजकीयदृष्ट्या जिवंत राहण्यासाठी’ केलं; पण जे केलं ते सारखंच होतं! आता कथेत आणखी एक “ट्विस्ट’ आलाय. “संगीत पहाटेचा शपथविधी’ या नाटकाचा पुढचा अंक प्रस्तावित होता आणि तो टाळण्यासाठीच सुरत-गुवाहाटी-गोवा मार्गावरून प्रवास झाला, असा “यॉर्कर’ कुणीतरी टाकलाय. खरंतर दुधानं तोंड पोळल्यावर लोक ताकसुद्धा फुंकून पितात म्हणे! पण सद्यःस्थितीत दूध, ताक, लोणी, दही, तूप सगळ्याची इतकी सरमिसळ झालीये, की काय फुंकून प्यायचं आणि काय तापवून घ्यायचं, याचाच पत्ता कुणाला लागेना राव!
उद्या ताक उतू गेलं आणि दुधातून लोणी निघालं तरी आश्चर्य वाटणार नाही. तरी दावे-प्रतिदावे सुरूच आहेत. ठाकरे गटानं राष्ट्रवादीप्रमाणंच दावा केलाय… मध्यावधी निवडणुका लागणार! कोणत्याही दिवशी निवडणूक जाहीर होईल, असं कॉंग्रेससुद्धा म्हणतेय. राज्यातले प्रकल्प गुजरातला नेणं, तिथल्या निवडणुका तोंडावर आलेल्या असणं आणि महाराष्ट्रातली नाराजी लक्षात घेऊन पंतप्रधानांनी “पॅकेज’ जाहीर करणं, यातच खरं गुपित दडलंय आणि म्हणूनच निवडणुका लागणार, अशीही मांडणी काहीजणांकडून केली जातीये.
कुणी कुणाचे दावे “कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी’ असल्याचं सांगून खोडून काढतोय, तर कुणी डायरेक्ट मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारच जाहीर करतोय. सगळ्यांनाच मंत्रिपदं हवी असल्यामुळे एकमेकांना धमकावायला सुरुवात झालीय, असाही एक मतप्रवाह आहे. कोण कुणाचे आमदार फोडणारंय, परमेश्वर जाणे! खरंतर राज्यात सत्तेसाठी कोणते दोन पक्ष एकत्र आलेत, हे समजायला अडीच वर्षे लागणं आणि संबंधित मैत्री नैसर्गिक आहे की अनैसर्गिक, हे ठरेपर्यंत पुढील निवडणूक लागणं हीच “नैसर्गिक’ पूर्णावस्था..!