भारतीय घटनेने सर्व स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क दिले असूनही प्रत्यक्ष व्यवहारात हे बरोबरीचे नाते किंवा ही समानता दिसून येत नाही. या समस्येचे विवरण सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी फारच मार्मिकपणे व मूलग्राही पद्धतीने केले आहे.
संस्कृतीचा आधार- प्रेम – भारतीय संस्कृती प्रेमावर आधारित आहे. घटनेने स्त्रीला हक्क दिले. परंतु जुन्या कल्पना गेल्या नाहीत. नव्या समाजरचनेत जुने संसार कसे करता येतील? आयुष्य बदलले पण राहणी जुनीच – गेल्या चाळीस वर्षांत समाजरचनेत सुधारणा झाली. गेल्या महायुद्धाने कुटुंबाची आर्थिक घडी बदलली.
स्त्रीला पुरषाच्या बरोबरीने नोकरी करून पोट भरणे भाग पडू लागले, पण आपली राहणी जुनीच. ज्यांच्या घरी नोकर नाही त्या स्त्रीने स्वयंपाक करावा, नोकरी करावी, पुन्हा लहान मुले सांभाळण्याची सोय नाही, म्हणून दोघे नोकरीला गेल्यावर मुले कुठे ठेवायची, हा प्रश्न पडतो. नोकरीला गेल्यावर आईला मुलांची काळजी वाटणारच ना?
अजून स्त्रीचे मनही जुनेच – त्यामुळेच हल्ली स्त्रियांवर फार बोजा पडतो. मग प्रकृती बरी राहत नाही. भोवतालचे वातवरण बदलले पण स्त्रीचे मन जुनेच आहे. जुनेच संस्कार आहेत. पुरुषांनी घरात काम करावे हे त्यांना अजून पटत नाही, आवडत नाही. याचा परिणाम संसारावर होतो. स्त्रीचे मन हे प्रेमावर अधिष्ठित आहे, पैशावर नव्हे. कुटुंबरचना बदलताना याचा विचार केला तरच आपली कुटुंबे
सुखी होतील.
स्त्रीची विरलेली स्वप्ने – मध्यमवर्गीय स्त्रीची लग्नापूर्वीची सर्व स्वप्ने संसारात पडल्यावर विरून जातात. अडचणींना तोंड देता देता बौद्धिक भूक मरून जाते. तेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीशी जुळणारी अशी नवी समाजरचना विचारपूर्वक निर्माण करायला हवी.
आजची स्त्री सुशिक्षित आहे. पण व्यवहारात मात्र सुखी नाही, समाजाच्या उपयोगी पडण्याकरिता तिला संसारात फार मोठा त्याग करावा लागतो. कारण स्त्री ही मुळात पतीच्या प्रेमाची भुकेली आहे, पैशाची नाही. आपले कुटुंब हे प्रेमावर आधारलेले आहे. पाश्चात्य देशातील कुटुंबातील व आपल्या कुटुंबातील हा फरक लक्षात ठेवण्याजोगा आहे.
आज आपल्यापेक्षा त्यांची जीवने अधिक सुखी आहेत, असे नाही. तेव्हा त्यांच्या धर्तीची समानता आम्हास नको आहे. आमच्या संस्कृतीच्या पार्श्वभूमीत बसेल अशीच समानता आम्हाला हवी.